Maharashtra Unlock | राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर, काय सुरु काय बंद?

राज्यात 11 जिल्हे वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये नियम शिथिल 

Updated: Aug 2, 2021, 07:57 PM IST
Maharashtra Unlock | राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर, काय सुरु काय बंद? title=
प्रतिनिधिक फोटो

मुंबई: राज्यातील नव्या नियमावलीकडे व्यापाऱ्यांसह जनतेचं लक्ष लागलं होतं. अखेर ही प्रतीक्षा संपली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यात 11 जिल्हे वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये नियम शिथिल करण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या नव्या नियमावलीकडे जनतेचं लक्ष लागलं होतं. अखेर ही प्रतिक्षा संपलेली आहे. 

सरकारने 25 जिल्ह्यांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार काही नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. सरकारने व्यापाऱ्यांना दिलासा दिलाय. तर दुसऱ्या बाजूला हॉटेल व्यावसायिकांना कुठलाच दिलासा दिलेला नाही. राज्यातील 25 जिल्ह्यांमधील नियमात शिथिलता आणली आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील कोणत्या गोष्टी सुरू राहणार आणि कसे आहेत नवीन नियम जाणून घ्या.

- 11 जिल्हे वगळता राज्यातील सर्व दुकानं सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार
- शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यास परवानगी
- रविवारी संपूर्ण दुकानं विकेण्ड लॉकडाऊन प्रमाणे बंद राहणार आहेत. 
- मॉल्स उघडण्यासही नव्या गाइडलाइन्सनुसार परवानगी देण्यात आली आहे
- खासगी कार्यालयं देखील पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
- जिम, योगा सेंटर, सलून, ब्युटी पार्लर, स्पा - 50 टक्के क्षमतेने रात्री 8 वा पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी.

सर्व सरकारी कार्यालयं 100 टक्के क्षमतेने सुरु होणार

राज्यात कोरोनाचा जोर पाहून गरजेनुसार सरकारी कार्यालयांमध्ये मोजक्याच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज सुरु होतं. दरम्या या नव्या नियमावलींनुसार, सर्व शासकीय कार्यालयं ही 100 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीने सुरु होणार आहेत. त्यामुळे आता कामकाज अधिक वेगाने होणार आहे.

सिनेमा  थिएटर आणि नाट्यगृहांबाबत निर्णय

कोरोना आणि तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सध्या सिनेमा, थिएटर आणि नाट्यगृह सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे थिएटर आणि सिनेमागृह आणि नाट्यगृह बंदच राहणार आहेत.

लोकलबाबत निर्णय काय?

राज्यात सर्वसामांन्यासाठी लोकल बंदच आहे. राज्य सरकारच्या नव्या नियमावलीत लोकल रेल्वेबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सर्वांसाठी लोकल सुरु करण्याबबातचा निर्णय हा प्रशासनाशी बोलून घेण्यात येणार आहे.

धार्मिक स्थळं बंदच

राज्यातील सर्व धार्मिक क्षेत्र ही बंदच राहणार आहेत. राज्यात काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक भक्त गर्दी करतात. यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची भिती असते. त्यामुळे सरकारने खबरदारी म्हणून धार्मिक स्थळं बंदच ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.

कोणत्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहणार?

कोल्हापूर
सांगली
सातारा
पुणे
रत्नागिरी
सिंधुदुर्ग
सोलापूर
अहमदनगर
बीड
रायगड
पालघर