राज्यात वर्षअखेरीस थंडी वाढणार, मुंबईवर मात्र भलतंच संकट; पाहा हवामानाचा अंदाज

Maharashtra weather news : विदर्भात तापमानात होणारी घट अद्यापही सुरुच असून, येत्या काळात थंडी आणखी वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पाहा देशाच्या उत्तरेकडे काय परिस्थिती...

सायली पाटील | Updated: Dec 27, 2023, 06:48 AM IST
राज्यात वर्षअखेरीस थंडी वाढणार, मुंबईवर मात्र भलतंच संकट; पाहा हवामानाचा अंदाज
Maharashtra weather news cold wave in north impacts in temprature drop down in the state

Weather Updates : नव्या वर्षाची चाहूल लागलेली असतानाच आता सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेकजण सरसावताना दिसत आहे. अनेकांनी या वर्षाचा शेवट गोड करण्यासाठी अमेक बेतही आखले आहेत. पण, त्याआधी हवामानाचा अंदाज पाहिला का? हवामान विभागाच्या माहितीनुसार वर्षअखेरीस राज्याच्या विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढणार आहे. किमान तापमानात काही अंशांची वाढ नोंदवण्यात येत असली तरीही राज्यात गारठा मात्र टिकून राहणार आहे. त्यामुळं थंडीचा सामना करण्यासाठीची तयारी करूनच पुढचे बेत आखलेलं उत्तम. (Maharashtra weather news)

Add Zee News as a Preferred Source

महाराष्ट्रात धुळे (8 अंश), परभणी (9 अंश) आणि निफाड (9.3 अंश) या भागांमध्ये निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. तर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी या भागांमध्ये रात्रीच्या तापमानात मोठ्या फरकानं घट झाल्याचं निदर्शनास आलं. पुढील दोन दिवस हे हवामान कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. 

देशाच्या उत्तरेकडे थंडीचं प्रमाण वाढलं असून, काश्मीरच्या खोऱ्या सध्या 'चिल्लई कलां' हा काळ सुरु झाला आहे. ज्यामुळं या भागावरून येणाऱ्या शीतलहरींचा परिणाम देशातील उर्वरित राज्यांमध्ये कमीजास्त प्रमाणात दिसून येत आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही थंडी वाढली असून, दिवसा मात्र तापमानात काही अंशांनी वाढ पाहिली जात आहे. असं असलं तरीही या भागांमध्ये ही थंडीची लाट दीर्घकाळासाठी टीकून राहील हाच अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 

हेसुद्धा वाचा : 'मोदी रामापेक्षा मोठे झाले का? असे पोस्टर दुसऱ्या कोणी छापले असते तर..'; ठाकरे गटाचा हल्लाबोल

 

मुंबईवर धुरक्याची चादर 

इथं महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांसह नवी मुंबई, पालघर आणि उपनगरीय क्षेत्रांमध्येसुद्धा थंडीनं जोर धरला असला तरीही मुंबई शहरावर मात्र भलतंच संकट ओढावलेलं दिसत आहे. शहरातील किमान तापमानात काहीशी घट झाली असली तरीही हवेतील धुरक्यांचं प्रमाण मात्र घातक पातळीवर पोहोचलं आहे. ज्यामुळं शहरातील नागरिकांना श्वसनाच्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. शहरामध्ये सुरु असणारी बांधकामं, वाहनांची ये-जा या आणि वाऱ्याचा मंदावलेला वेग यामुळं हवेत असणाऱ्या धुलिकणांना पुढं जाण्यास वाव नसून ते एकाच ठिकाणी बराच वेळ तरंगत असल्यामुळं शहराला धुरक्यानं विळख्यात घेतल्याचं पाहायला मिळत आहे. या कारणास्तव सध्या शहरातील दृश्यमानतासुद्धा मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More