देवेंद्र फडणवीसही कोणासोबत आहेत कळत नाही; अमृता फडणवीसांसमोरच राज ठाकरेंचा टोला, उपस्थितांना आवरेना हसू

Raj Thackeray on Devendra Fadnavis: राज्यातील सध्याच्या स्थितीवर बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी अमृता फडणवीस (Amruta Fadnvais) यांच्यासमोरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.  

शिवराज यादव | Updated: Apr 26, 2023, 08:34 PM IST
देवेंद्र फडणवीसही कोणासोबत आहेत कळत नाही; अमृता फडणवीसांसमोरच राज ठाकरेंचा टोला, उपस्थितांना आवरेना हसू title=

Raj Thackeray on Devendra Fadnavis: राज्यात सध्या राजकीय स्थिती फार गुंतागुंतीची झाल्याचं चित्र आहे. एकीकडे अजित पवार (Ajit Pawar) पक्षाविरोधात बंड पुकारून भाजपासोबत (BJP) जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या असताना दुसरीकडे शिंदे गटातील काही आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे (Uddhav Thackeray) येणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, सध्याच्या राजकीय स्थितीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाष्य केलं आहे. यावेळी अमृता फडणवीस यांच्यासमोर राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा उल्लेख करत टोला लगावला. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 

अमृता फडणवीस यांनी मुलाखतीदरम्यान राज ठाकरेंना राज्यात सध्या डोळे मारणे, मिठी मारणे अशा गोष्टी सुरु असल्याचं सांगितलं. यावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की "महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीही सध्या कोणासोबत आहेत हेदेखील कळत नाही. पहाटे गाडी घेऊन जातात. तुम्हाला पत्ता नसतो. कधी ते शिंदेंसोबत दिसतात, मग पहाटे अजित पवारांचा चेहरा उतरलेला दिसतो". यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 

कोणी कोणाला भेटलं म्हणून लगेच युती, आघाडी होत नसते. त्याला मुर्तीरुप येत नाही तोवर त्याला काही अर्थ नसतो असंही यावेळी राज ठाकरेंनी सांगितलं. तसंच ज्या वयातल्या गोष्टी त्या वयात करायच्या असतात. त्यांच्या राहून गेल्या असतील म्हणून आता मारत असतील असाही टोला त्यांनी लगावला. 

"काही गोष्टींची फोड होणं गरजेचं आहे. भोंग्याचा त्रास सर्वांना होतो. माहिमच्या दर्ग्याचा मुद्दा काढला नसता तिथे दुसरं हाजी अली झालं असतं. मग याच्यात धर्म कुठे आला. मी एकदा घरी झोपलेलो असता सकाळी 5 वाजता 'हरे रामा, हरे कृष्णा' आवाज आला. मला त्याचा त्रास होत होता. यानंतर त्याला एक चांगला संदेश पाठवला," असं राज ठाकरेंनी सांगितलं. 

दरम्यान अमृता फडणवीस यांनी मुलाखतीच्या सुरुवातीला तुमच्याकडे शिवसेना पक्षाची धुरा असती तर काय झालं असतं असं विचारलं असता, मी धुरा सांभाळली असतं तर काय यावर चर्चा करणं मला योग्य वाटत नाही. ते सगळं आता संपलं आहे. मी माझा स्वतंत्र पक्ष काढला असून तो चालवत आहे असं उत्तर दिलं. 

"सहज बोलता येतील अशा अनेक गोष्टी आहेत. आपल्या देशात कायदा आहे सुव्यवस्था नाही. माझा मुंबई पोलिसांवर 100 टक्के विश्वास आहे. त्यांना 48 तास द्या आणि त्यांना महाराष्ट्र साफ करुन द्या म्हणून सांगा. त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात. पण भूमिका घेता येत नाही. ते उगाच का जेलमध्ये जातील. बसलेलाच माणुस तात्पुरता असताना आपण जेलमध्ये का जावं असं त्यांना वाटत असतं," असं विधान राज ठाकरेंनी केलं. यावेळी राज ठाकरेंनी उज्ज्वल निकम यांनाही बरोबर की नाही असं मिश्किलपणे विचारलं.