मराठवाड्याच्या सुखाची, समृद्धीची स्वप्ने पूर्ण करणार - मुख्यमंत्री ठाकरे

 'मराठवाडा मुक्तिदिनाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी शपथ घ्यायला पाहिजे की, मी माझा मराठवाडा कोरोनामुक्त करेन'

Updated: Sep 17, 2020, 11:42 AM IST
मराठवाड्याच्या सुखाची, समृद्धीची स्वप्ने पूर्ण करणार - मुख्यमंत्री ठाकरे  title=
संग्रहित छाया

मुंबई : मराठवाडा ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. संतांची शिकवण आहेच, पण त्याच बरोबरीने अन्यायाविरुद्ध लढून अन्याय मोडून, तोडून टाकणे आणि स्वातंत्र्य मिळवणे ही आपल्या भूमीची आणि मातीची खासियत आहे, असे उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. मराठवाडा मुक्तिदिनाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी शपथ घ्यायला पाहिजे की, मी माझा मराठवाडा कोरोनामुक्त करेन आणि तुमच्यासोबत आम्ही सुद्धा शपथ घेतो आहे की जी ताकद, अधिकार तुम्ही आम्हाला दिला आहे, त्याचा वापर आम्ही मराठवाड्याची सुखाची, समृद्धीची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी वापरेन, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांनी आज मराठवाडा मुक्ती संग्रामच्या निमित्ताने महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. कोरोनाशी लढताना मी संपूर्ण महाराष्ट्रासाठी मोहीम दिली आहे, "माझे कुटुंब, माझी जबाबदारी"! ज्याप्रमाणे त्यावेळेला ध्येयाने, उद्देशाने प्रेरित होऊन सगळे अबालवृद्ध मराठवाडा मुक्त करण्यासाठी युद्धात उतरले होते, तसेच मला मराठवाड्याचे नागरिक कोरोनापासून मुक्त होण्याचा लढाईमध्ये पाहिजेत, असे ते म्हणाले.

लहान कोवळ्या बालकांपासून ज्येष्ठ, महिला, काही दाम्पत्य लढ्यामध्ये सहभागी झाले होते. मी काय करू शकतो? मला काय करता येईल? या एका उद्देशाने आणि माझ्या मराठवाड्यातील रझाकारांचे जुलूम, अत्याचार मोडून टाकण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने जीवाची पर्वा न करता सहभागी झाला होता. मला खात्री आहे, ज्याप्रमाणे त्या स्वातंत्र्यलढ्याच्या वेळेला मराठवाड्यातील अबालवृद्ध एकवटून त्यांनी तो रझाकारी अत्याचार मोडून टाकला, तसच आपलं विषाणू बरोबरच दुसरं युद्ध आहे, त्याच्याबरोबर आपल्याला लढायचं आहे. या सगळ्या ज्ञात, अज्ञात वीरांना, शुरांना मी मनापासून अभिवादन करत आहे, मानवंदना देत आहे. केवळ आपण होतात, म्हणून आजचा दिवस आम्ही पाळू शकत आहे, असे ते म्हणाले.

आजच्या मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या निमित्ताने झेंडावंदन करताना, मानवंदना देताना हा मराठवाडा मुक्त झाल्यानंतर पहिला तिरंगा इथे फडकला असेल तो रोमांचकारी क्षण, त्या भावना आजदेखील ताज्या आहेत. या दिनाच्या शुभेच्छा देताना मी भावनेने, मनाने आणि हृदयाने आपल्यासोबत तिथे उपस्थितच आहे. या शुभेच्छा देत असताना मी तमाम मराठवाडाकरांचे आशीर्वाद मागत आहे की हे मुक्त शिवधनुष्य आहे, ते पेलण्याची ताकद आणि हिंमत आम्हाला द्यावी, अशी साथ मुख्यमंत्र्यांनी घातली.

 मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस

आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस,  स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर १९४८ मध्ये भारत सरकारने निजाम शासनाविरुद्ध पोलिस कारवाई करुन हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारतदेशात सामावून घेतले. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद राज्य निजामापासून मुक्त केले गेले. म्हणून आजचा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एका वर्षानंतर मराठवाडा मुक्त झाला. या वेळी थोर स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली अनेक स्वातंत्र्यसेनानींनी केलेल्या कामांमुळे आज या दिनाला विशेष महत्त्व आहे. आज औरंगाबादेत पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या कार्यक्रमाला एरव्ही मुख्यमंत्री हजार असतात, मात्र कोविड-१९ मुळे यावेळी त्यांना ऑनलाईन संवाद साधला.