मुंबईचा दूध पुरवठा तोडणार- राजू शेट्टी

 शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार काहीही हालचाल करताना दिसत नाही, असा आरोपही शेट्टी यांनी केला आहे

Updated: Jul 1, 2018, 01:13 PM IST
मुंबईचा दूध पुरवठा तोडणार- राजू शेट्टी title=

मुंबई: दुधाचे दर पडल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार काहीही हालचाल करताना दिसत नाही. त्यामुळे आक्रमक होत स्वाभिमीनी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी येत्या १६ जुलैपासून मुंबईचा दूध पुरवठा तोडण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच गोकुळ दूध उत्पादक संघाने गाय दूध खरेदी दरात दोन रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाची २० जूनपासून अंमलबजावणी करण्याचा निर्णयही घेण्यात आला. गाईच दूधाचं अतिरिक्त उत्पादन झाल्याने दूधच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. निर्णयामुळे गाय दूध खरेदी दर २५ रुपयांवरुन २३ रुपयांवर आलाय. गोकुळ हा कोल्हापूरातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील मोठा दूध उत्पादक संघ आहे. त्यामुळे या संघाच्या निर्णयाचा मोठा परिणाम शेतकऱ्यांवर होतो.

दूध उत्पादकांना तोटा

सरकारने जाहीर केलेल्या दूध दरापेक्षा दूध उत्पादकांना प्रति लिटर ४ रुपये तोटा सहन करावा लागणार आहे. तर, विक्री दरात देखील केली कपात करण्यात आली आहे. गाईचे दूध ४४ रुपये लिटरनं ग्राहाकाला खरेदी करावं लागत होतं. आता मात्र हे दूध ४२ रुपये दराने मिळणार आहे.

दूध उत्पादकांमध्ये संताप

दरम्यान, निर्णय ग्राहकांना दिलासा देणारा असला तरी, गाय दूध उत्पादक शेतकऱ्याचं मात्र कंबरडे मोडणार निर्णय आहे. त्यामुळे गाय दूध उत्पादक चांगलेच संतापलेत.