आदित्य ठाकरे यांचे युतीबाबत सूचक वक्तव्य

उद्या दिल्लीमध्ये बैठकीत सर्वजण जाणार आहेत आणि आम्ही कुठल्या थरात असणार आहोत, हे स्पष्ट होणार आहे, असे वक्तव्य युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केले.

Updated: Jan 10, 2019, 10:37 PM IST
आदित्य ठाकरे यांचे युतीबाबत सूचक वक्तव्य title=

नाशिक : दहीहंडीच्या खेळात दही फोडणारा एक जण असतो तर त्याखाली त्याला वर नेणाऱ्या अनेक थर असतात एकत्रित पणाने तोही उंची गाठू शकतो, अशाच पद्धतीने उद्या दिल्लीमध्ये बैठकीत सर्वजण जाणार आहेत आणि आम्ही कुठल्या थरात असणार आहोत, हे स्पष्ट होणार आहे, असे वक्तव्य करत आज शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केले. त्यांनी अप्रत्यक्षपणे युतीच्या भवितव्याचा चेंडू भाजप भाजपकडे टोलविला आहे. म्हाडाच्या कर्मचाऱ्यांच्या संस्कृती सोहळ्यात व्यासपीठावर रंगलेल्या कोपरखळ्यामध्ये युतीचे राजकारण रंगले. याचीच जास्त चर्चा सुरु होती. नाशिक शहरात आरोग्य विद्यापीठात म्हाडाच्या कर्मचाऱ्यांचा मुक्तछंद हा सांस्कृतिक कार्यक्रम गुरुवारी संध्याकाळी रंगला. यात सर्वसामान्यांना घर देण्याच्या श्रेयावरून भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळाले.

युतीबाबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी दहीहंडीच्या खेळाची उपमा युतीच्या सरकारला दिली. दोन्ही पक्षांची युती ही एकत्रितपणे राहिली तरच यश मिळू शकते, असे अप्रत्यक्षपणे दाखवत मोदींच्या दिल्ली भाजपच्या कार्यकारणीच्या बैठकीत शिवसेना कुठल्या थरावर राहणार हे भाजपचे नेते ठरवतील, असे अप्रत्यक्षपणे दहीहंडीच्या खेळाचे विश्लेषण करताना स्पष्ट केले.

भाजपच्या नेत्यांनी म्हाडाच्या माध्यमातून प्रत्येकाला घर मिळले आणि पंतप्रधानांचे स्वप्न साकार होणार, असे म्हटले तर अध्यक्ष उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्याशिवाय हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही, अशी कोपरखळी मारली. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात चांगलेच राजकारण रंगले. भाजपच्या मधू चव्हाण यांनी आज प्रत्येक माणूस दुर्दैवाने पक्षांच्या लेबलने ओळखला जाऊ लागल्याची परिस्थिती समोर आणली. कोपरखळीच्या वादविवादांमध्ये श्रेयवादाची लढाई आणि राजकारणाचे चित्र या निमित्ताने पाहायला मिळाले.