'काळजी करू नका, हातात काहीच लागणार नाही', काँग्रेसचा फडणवीसांवर निशाणा

काँग्रेसचा भाजपवर निशाणा

Updated: Jul 18, 2020, 04:13 PM IST
'काळजी करू नका, हातात काहीच लागणार नाही', काँग्रेसचा फडणवीसांवर निशाणा title=

नागपूर : राजस्थानचं सरकार पाडण्यासाठी भाजपकडून मुंबईतून ५०० कोटी रुपये जमा केले जात असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. यानंतर आता काँग्रेस नेते आणि उर्जा मंत्री नितीन राऊत यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे. 'एकीकडे कोरोनाविरुद्ध लढा सुरू असताना भाजपकडून राज्य सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे, हे संविधानाला छेद देणारे आहे. राजस्थानमध्ये जे घडलं ते दुर्दैवी आहे. पैसे घेऊन आमदारांना विकत घेण्याचा मी निषेध करतो,' अशी प्रतिक्रिया नितीन राऊत यांनी दिली आहे. 

'महाराष्ट्र सरकार मजबूत आहे. पुढची पाच वर्ष हे सरकार चालेल. मुख्यमंत्री आणि आमचे अध्यक्ष सगळ्या आमदारांशी संपर्कात आहेत. आपण काळजी करू नका देवेंद्रजीच्या हातात काही लागणार नाही,' असंही नितीन राऊत म्हणाले. 

काँग्रेसकडून राजस्थानात घोडेबाजार केल्याचे आरोप भाजपने फेटाळून लावले आहेत. तसंच सचिन सावंत यांनी माफी मागावी, अशी मागणीही भाजपने केली आहे.

काँग्रेसचे आरोप भाजपने फेटाळले

देवेंद्र फडणवीस यांनी काल त्यांच्या दिल्ली दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत राज्यातल्या कोरोनाच्या परिस्थितीची चर्चा झाली, तर गृहमंत्र्यांसोबतच्या बैठकीत साखर प्रश्नावर चर्चा झाली. कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा झाली नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तसंच राज्यातलं सरकार पाडण्यात रस नसल्याचंही फडणवीस म्हणाले. 

देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटायला सुरुवात झाली. राजकीय प्रादूर्भाव होणार नाही, कारण आम्ही फवारणीचे पंप घेऊन फिरत आहोत. आमचं सरकार ५ वर्ष टिकेल आणि उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहतील, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.

'फवारणीचे पंप घेऊन फिरतोय, त्यामुळे...', फडणवीसांच्या दिल्ली भेटीवर राऊतांची प्रतिक्रिया

तर यशोमती ठाकूर यांनीही फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावर टीका केली. भाजपच्या १०५ आमदारांपैकी काही आमदार आमच्या संपर्कात आहेत, असं यशोमती ठाकूर गुरुवारी म्हणाल्या होत्या. भाजपचे आमदार आमच्या संपर्कात आल्याची बातमी बाहेर आल्यामुळे फडणवीसांना दिल्लीला जावं लागल. आम्ही एक आहोत, असं स्पष्टीकरण त्यांना आपल्या पक्षश्रेष्ठींना द्यावं लागलं, असं ठाकूर म्हणाल्या.

'...म्हणून फडणवीसांना दिल्लीला जावं लागलं', यशोमती ठाकूर यांचा पुन्हा निशाणा