Coronavirus : राज्यात सप्टेंबर महिन्यातील संसर्गात चिंताजनक वाढ

राज्याची वाटचाल...

Updated: Oct 1, 2020, 07:37 PM IST
Coronavirus : राज्यात सप्टेंबर महिन्यातील संसर्गात चिंताजनक वाढ  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव फोफावण्यास सुरुवात झाल्यापासून राज्यात आतापर्यंतचा सर्वाधिक संसर्गाचा मासिक दर सप्टेंबर महिन्यात आढळून आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सप्टेंबर महिन्यात जवळपास ४ टक्क्यांनी संसर्गात वाढ झाली आहे. संकटाची तीव्रता दिवसागणिक वाढत असली तरीही अपेक्षित प्रमाणात चाचण्यांची संख्या मात्र वाढवलेली नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याचसंबंधीची धास्तावणारी आकडेवारी मांडत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. 

अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्याचं आव्हान असताना आणि पाच महिन्यांचा कालखंड चाचण्या न वाढविण्यात निघून गेला असताना पुन्हा एकदा चाचण्यांवर लक्ष केंद्रीत करण्याची विनंती त्यांनी या पत्रातून केली आहे.

ऑगस्ट महिन्यात राज्यात चाचण्यांची संख्या 42 टक्क्यांनी वाढविल्यानंतर ती आणखी वाढविण्याची गरज होती. पण, सप्टेंबरमध्ये ऑगस्टच्या तुलनेत केवळ 26 टक्के अधिक चाचण्या करण्यात आल्या. जुलैमध्ये दर दिवशी 37,528, ऑगस्टमध्ये प 64,801 तर सप्टेंबरमध्य 88,209 चाचण्या करण्यात आल्या. केंद्र सरकारकडूनही चाचण्या वाढविण्यासंबंधी वारंवार सूचना दिल्या जात आहेत. प्रत्यक्षात मात्र दिवसागणिक चाचण्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

राज्यातील प्रत्येक महिन्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण पुढीलप्रमाणे 

एप्रिल (8.04 टक्के), मे (18.07 टक्के), जून (21.23 टक्के), जुलै (21.26 टक्के), ऑगस्ट (18.44 टक्के), सप्टेंबर (22.37 टक्के). 

मुंबईत तर स्थिती आणखी भीषण.... 

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल आणि देशाच्या आर्थिक राजधानीचे चक्र पुन्हा कार्यरत करायचे असेल तर मुंबईसारख्या लोकसंख्येतील चाचण्यांचे प्रमाण कितीतरी अधिक असायला हवं. मुंबईला अनेक उपनगरं जोडली आहेत. मुंबईतून कोकणात सुद्धा लोकांचे आवागमन मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे तेथे सुद्धा कमी चाचण्यांमुळे प्रादुर्भावाचा फटका बसत आहे. 

पालघरमध्ये संसर्ग दर 28 टक्के, रायगडमध्ये 31 टक्के, रत्नागिरीमध्ये 20.1 टक्के, नाशिकमध्ये 27 टक्के, नगरमध्ये 27 टक्के, उस्मानाबादमध्ये 22.7 टक्के असा संसर्ग दर आहे. चाचण्या वाढविल्या जात नसल्याने विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा रूग्णसंख्येत कितीतरी पटींनी वाढ होते आहे. भंडार्‍यात ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये रूग्णवाढ 663 टक्के, गोंदियात 496 टक्के, चंद्रपुरात 570 टक्के, गडचिरोलीत 465 टक्के इतकी असल्याचा तपशील त्यांनी या पत्रात नमूद केला. 

 

मुंबईसह ज्या ज्या भागात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे, किमान त्या ठिकाणी चाचण्यांच्या संख्येत त्वरित वाढ करण्यात यावी अन्यथा चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी दवडला जाणारा प्रत्येक दिवस भविष्यात आणखी मोठ्या समस्यांना आमंत्रण देणारा ठरेल अशी भीती त्यांनी या पत्रातून व्यक्त केली.