समृद्धी महामार्गावरून प्रवास करण्याआधी नवीन नियम जाणून घ्या, दर 10 किमीवर...

Samruddhi Mahamarg : तुम्ही जर समृद्धी महामार्गावरून प्रवास करणार असाल तर सावधगिरी नक्कीच बाळगा. कारण आता या मार्गावर बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यात येत आहे.  

श्वेता चव्हाण | Updated: Mar 12, 2024, 11:55 AM IST
समृद्धी महामार्गावरून प्रवास करण्याआधी नवीन नियम जाणून घ्या, दर 10 किमीवर... title=

Samruddhi Mahamarg News In Marathi : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गच्या नागपूर-शिर्डी या 520 किमीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन 11 डिसेंबर 2022 रोजी झाले. वर्षभरात 58 लाख 1 हजार 154 वाहने प्रवास केला. तसेच वाहनांकडून 422 कोटी 9 लाख 79 हजार 399 रुपयांचा टोल टॅक्स वसूल करण्यात आला आहे. राज्याची राजधानी आणि उपराजधानीमधील स्थलांतरातील अंतर कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) 701 किमी समृद्धी महामार्गाचे काम हाती घेत आहे. 

 हा समृद्धी महामार्गावर सुरु झाल्यापासून अपघांतामुळे वादात सापडला आहे. वर्षभरातील अपघातांच्या यादीनुसार महामार्गावर आतापर्यंत (डिसेंबर 2022 ते डिसेंबर 2023) 73 अपघात झाले आहेत. यात 142 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर सर्वाधिक 20 अपघात हे वाहनावरील नियंत्रणामुळे झाले आहेत. याचपार्श्वभूमिवर समृद्धी महामार्गावर आता बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यात येत आहे. 

गेल्या वर्षभरात समृद्धी महामार्गावर अपघातांचे प्रमाण अधिक आहे. हीच बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गावर वेगमर्यादा न पाळणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी प्रत्येक 10 किलोमीटर अंतरावर वाहनांचा वेग मोजणारी यंत्रणा उभारली जाणार आहे. यामुळे बेशिस्त वाहनचालकांना चाप बसण्यास मदत मिळणार असून, अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करणं शक्य होणार आहे. या यंत्रणेसाठी महामंडळाकडून 1 हजार 498 कोटी रुपये खर्चुन इंटिलिजंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टम (ITMS) बसविण्यात येणार आहे. त्यासाठी कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. 

समृद्धी मार्गावरील वाहनांची वेगमर्यादा किती आहे?

समृद्धी महामार्गा हा 701 किलोमीटर लांबीचा आहे. या महामार्गावर 24 ठिकाणांवरुनच वाहनांना प्रवेश दिला जाईल. या मार्गावर दिलेली वेगमर्यादा 150 किलोमीटर प्रतितास आहे. फक्त सध्याच्या परिस्थितीत या रस्त्यावर वेगमर्यादा ताशी 120 किलोमीटर आहे. वेगमर्यादा ठरलेली असताना ही यापेक्षा जास्त वेगाने वाहने येथून जाताना दिसतात. एवढंच नाही तर लेनची शिस्त देखील या महामार्गावर पाळली जात नाही. याच कारणामुळे अपघात येथे होतात. या बेशिस्त वाहनचालकांना चाप बसवण्यासाठी यासोबतच महामार्गावर अपघात झाल्यास तत्काळ मदत पोहोचावी यासाठी विशेष आयटीएमएस यंत्रणा उभारण्यात येणार आहे.

ITMS ची वैशिष्ट्ये

  • वाहन वेग दाखवणारी यंत्रणा प्रत्येक 20 किमी अंतरावर असणार आहे.
  • महामार्गावर दर 100 किमी अंतरावर  ट्रॅफिक मॅनेजमेंट केंद्र असेल. 
  • प्रत्येक TMC वर 2 ड्रोन यंत्रणा आणि हायवे पोलिसांसाठी 2 स्पीड गन यंत्रणा आहेत
  • बोगद्यात लेन कंट्रोल सिस्टम.
  • प्रत्येक एंट्री, एक्झिट आणि बोगद्याच्या प्रवेशद्वारावर डिजिटल बोर्ड असणार
  •  महामार्ग सहाय्यासाठी अत्यावश्यक कॉल बूथ असणार. 
  • आपत्कालीन संवादासाठी वायरलेस मोबाइल रेडिओ कम्युनिकेशन सिस्टम