30 पेक्षा जास्त आमदार वर्षावर, शिवसेनेचा दावा; शिंदेंच्या बंडाचे काय होणार?

Maharashtra Political Crisis: शिवसेनेत फूट पडल्याचे सांगितले जात आहे. नाराज मंत्री एकनाथ शिंदे यांची बंड पुकारले आहे. त्यांच्यासोबत आधी 21 आमदार असल्याचे सांगण्यात येत होते. आता तर 35 आमदारसोबत आहेत, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र..

Updated: Jun 21, 2022, 01:22 PM IST
30 पेक्षा जास्त आमदार वर्षावर, शिवसेनेचा दावा; शिंदेंच्या बंडाचे काय होणार? title=

मुंबई : Maharashtra Political Crisis: शिवसेनेत फूट पडल्याचे सांगितले जात आहे. नाराज मंत्री एकनाथ शिंदे यांची बंड पुकारले आहे. त्यांच्यासोबत आधी 21 आमदार असल्याचे सांगण्यात येत होते. आता तर 35 आमदारसोबत आहेत, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र, शिवसेनेच्या दाव्याने शिंदे यांच्यासोबत किती आमदार आहेत, याचीच चर्चा सुरु झाली आहे. वर्षावर 30 हून अधिक आमदार हजर असल्याचा शिवसेनेने दावा केला आहे.

एकनाथ शिंदे सूरतमध्ये असल्याची सूत्रांची माहिती आहे. सूरतच्या द ग्रँड भगवती हॉटेलमध्ये काही आमदारांची बैठक झाली. धक्कादायकबाब म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासह द ग्रँड भगवतीमध्ये शिवसेनेचे 21 आमदार असल्याची माहिती होती. यात काही आमदारांची वाढ होत 35 आमदार असल्याचे सांगितले जात आहे. हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेत्यांची बैठक झाल्याची माहिती सूत्रांची आहे. एकनाथ शिंदे यांची गुजरात प्रदेश अध्यक्ष सी. आर. पाटील यांच्याशी रात्रीच भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे. शिवसेना आमदार मंत्री तानाजी सावंतही नॉट रिचेबल असल्याची माहिती उघड होत आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शिवसेनेची बैठक होत आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत, खासदार विनायक राऊत आणि अनिल देसाई वर्षावर बैठकीसाठी पोहोचले आहेत. त्यामुळे आता या बैठकीत काय निर्णय होणार याची उत्सुकता आहे.

शिवसेना ही निष्ठावंताची सेना आहे. शिवसैनिक हा निष्ठावंत आहे. काही आमदारांना गैरसमजातून बाहेर नेलं आहे. अनेक आमदारांशी आमचा संपर्क झालेला आहे. एकनाथ  शिंदे यांच्याशीदेखील बोलणं झालेलं आहे. भूकंपाची भाषा कोण करत असेल तर त्यांनी शिवसेनेशी लढावं लागेल. जे बाहेर आहेत त्यांच्याशी आमची चर्चा सुरु आहे. राजकारणात अशा प्रसंगाना सामोरं जावं लागते, अशी प्रतिक्रिया सध्याच्या राजकीय परिस्थितीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली. राजस्थान, मध्य प्रदेश पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही, असे राऊत म्हणाले.

कामकाज करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नेहमी आढावा घेत असतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांच्याशी बोलणे सुरुच आहे. आमची चर्ची सुरु आहे. राजकारणात अशा प्रसंगाना सामोरं जाव लागत असते. काही लोक अफवा पसरवत आहेत. काहीही होणार नाही. अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा राऊत यांनी केला आहे. काही आमदारांना गैरसमजातून बाहेर नेले आहे. त्यामुळे काहीही धोका नाही, असे राऊत म्हणाले.