राज्यावर अवकाळी संकट कायम; विदर्भ - मराठवाड्यात अनेक भागात पाऊस, पुढील 3 दिवस यलो अलर्ट

राज्यावर अवकाळी पावसाचे संकट कायम दिसून येत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक भागात पाऊस सुरु आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 2 मेपर्यंत पावसाची शक्यता आहे.

सुरेंद्र गांगण | Updated: Apr 29, 2023, 09:09 AM IST
राज्यावर अवकाळी संकट कायम; विदर्भ - मराठवाड्यात अनेक भागात पाऊस, पुढील 3 दिवस यलो अलर्ट title=

Maharashtra Unseasonal Rain : राज्यावर अवकाळी पावसाचे संकट कायम दिसून येत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक भागात पाऊस सुरु आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 2 मेपर्यंत पावसाची शक्यता आहे.

मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला. त्यामुळे शहरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून गुडघाभर पाण्यातून नागरिकांना रस्ता शोधावा लागतोय. वापाऱ्यांचा दुकानात पाणी शिरल्यान त्यांचं मोठं नुकसान झाले. बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आलेली मडकी वाहून गेल्यानं कुंभारांचं मोठं नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेकांच्या दुचाकी गाड्या वाहून गेल्यात. नगरपरिषध प्रशासनाकडून वेळेच नालेसफाई केली नसल्यानं अशी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तर धुळे जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपून काढले आहे. जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये गारपीट झाली आहे. वीज पडून तीन जनावरांचा मृत्यू झालाय. तर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहे. रात्री अनेक ठिकाणी वीजपुरवठाही खंडित होता.. तर अवकाळी पावसाने पालेभाज्या आणि फळबागांचं मोठं नुकसान झाले आहे.

धाराशिव जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी पाऊस

धाराशिव जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने तडाखा दिलाय...कळंब, उमरगा, वाशी, तुळजापूरसह धाराशिवमध्ये रात्री विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसाने पिकांसह फळबागांचा मोठं नुकसान झाले आहे. ढोकी परिसरात शेताच्या फडात उभी असणारी ज्वारी या पावसामुळे आडवी झाली आहे. ज्वारीची कणसे भिजल्यामुळे काळी पडली आहेत. तर कडब्याचंही मोठं नुकसान झालंय...शेतांच्या शिवारामध्ये पाणी साठल्याचे चित्र आहे. जोरदार वाऱ्यामुळे फळबागाही उखडून पडल्या आहेत तर वीज कोसळून दोन शेतकरी आणि 15 जनावरे दगावली आहे. आज सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता आहे. यामुळे बळीराजा चिंतेत आहे. 

देशातही पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दिल्लीमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. 29 आणि 30 एप्रिल रोजी देखील मध्यम पाऊस अपेक्षित आहे. यानंतर 1 ते 3 मे दरम्यान वादळाचा तडाखा बसू शकतो. तसेच वादळाची तीव्रता आणि कालावधी वाढेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यासोबतच विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी पाऊस होईल. तसेच अनेक भागात गारपीटही होऊ शकते. 4 मे रोजी हवामान स्वच्छ होईल. मात्र, दुसऱ्या दिवशी म्हणजेच 5 मे रोजी पुन्हा पावसाची शक्यता आहे, असे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे.

या राज्यांमध्येही पावसाचा अंदाज  

उत्तराखंडमध्ये 29 एप्रिल ते 2 मे, राजस्थानमध्ये 29 एप्रिल, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये 1 ते 2 मे दरम्यान गारपीट होऊ शकते. 30 एप्रिल ते 1 मे दरम्यान झारखंडच्या अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे  पश्चिम बंगाल, सिक्कीममध्ये 29 एप्रिल आणि 1 मे रोजी पावसाची शक्यता आहे. ओडिशामध्ये 30 एप्रिल रोजी पाऊस पडू शकतो. यासोबतच तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये पुढील 5 दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे.