मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली; 7 पैकी 5 धरणं पूर्ण क्षमेतेने भरली

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय देखील पूर्ण भरले आहे.  पहाटे केलेल्या मोजणी नुसार सर्व धरणांमध्ये मिळून एकूण 89.10 टक्के जलसाठा झाला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Aug 4, 2024, 06:40 PM IST
मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली; 7 पैकी 5  धरणं पूर्ण क्षमेतेने भरली   title=
Mumabi Vaitarna Lake: मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या सात जलाशयांपैकी 'हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय' पूर्ण भरले आहे. ज्यानंतर तलावाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून 706.30 क्युसेक या दराने जल विसर्ग सुरू आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.
 
गेल्याच महिन्यात तुळशी, विहार, मोडक सागर, तानसा हे तलाव ओसंडून वाहू लागल्यानंतर त्यापाठोपाठ आज 'हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय' देखील पूर्ण भरले आहे. यानुसार यंदाच्या पावसाळ्यात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या 7 तलावांपैकी 5 तलाव आतापर्यंत पूर्ण क्षमतेने भरले आहेत. मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे.
आज मध्यरात्र भरलेल्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयाची कमाल पाणी साठवण क्षमता ही 193,530 दशलक्ष लिटर (19,353 कोटी लीटर) इतकी आहे. 
 
मुंबई महानगरपालिकेने पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात 102.04 मीटर उंचीचे आणि 565 मीटर लांबीचे मध्य वैतरणा धरण सन 2014 मध्ये पूर्ण केले. हे धरण महानगरपालिकेने विक्रमी वेळेत बांधून पूर्ण केले होते. या धरणाचे नामकरण 'हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय' असे करण्यात आले आहे. 
 
मुंबईला पाणीपुरवठा करणा-या 7 धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता ही  1,44,733.3 कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी आहे. आज पहाटे ६ वाजताच्या मोजणीनुसार सर्व 7 तलावांमध्ये मिळून 89.10 टक्के इतका जलसाठा आहे.
ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाला... गेल्या 24 तासात 199 मिलिमीटर पावसाची नोंद झाली...त्यामुळे एका दिवसात धरणाच्या पाणीसाठ्यात 7 टक्क्याने वाढ झालीये...बारवी धरणातील पाणीसाठा सध्या 89 टक्क्यांवर पोहोचला आहे...
 
भीमा खोऱ्यातील चास कमान धरण पुर्ण क्षमतेनं भरलंय...त्यामुळे 20 हजार 500 क्युसेसने भीमानदीपात्रात विसर्ग सुरु करण्यात आलाय...सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर पाऊसाची जोरदार बँटिंग सुरु आहे...त्यामुळे चासकमान जलाशय ओव्हरफ्लो झालंय...