राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये पुढचे 5 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता... तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट पाहा

Updated: Nov 14, 2021, 05:41 PM IST
राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये पुढचे 5 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा title=

मुंबई: शेतकरी आणि बागायतदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुढे चार दिवस पुन्हा पावसाचे असणार आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यातही पावसानं थैमान घातलं होतं. आता पुन्हा एकदा पुढचे 4 दिवस राज्यात पाऊस असणार आहे. 

पुढील चार ते पाच दिवस राज्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागानं पावसाचा इशारा दिला आहे. 

17 नोव्हेंबरच्या आसपास अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे 14 ते 18 नोव्हेंबर दरम्यान राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

14 ते 18 नोव्हेंबर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्हात वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद परिसरात पुढे दोन दिवस पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. या जिल्ह्यांसाठी यलो अलर्टही देण्यात आला आहे.

सातारा शहरासह जिल्ह्यात अनेक भागात आज अवकाळी पाऊसाने हजेरी लावली. सातारा जिल्ह्यातआज सकाळ पासून ढगाळ वातावरण तयार झाले होते त्यानंतर आज दुपारी या अवकाळी पावसाच्या सरी काही भागात कोसळल्या.अधून मधून पावसाची रिपरिप होते आहे

रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागांमध्ये दुपारपासून पावसाच्या जोरदार सरी बसरत आहेत. तर अनेक भागांमध्ये विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाट होत असून वाऱ्याचा वेग देखील काही प्रमाणात वाढला आहे. जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण असून सॅटेलाईन इमेजवरून जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.