राज्यात दिवसभरात ६८७५ नव्या कोरोना रुग्णांची वाढ; २१९ जणांचा मृत्यू

राज्यात आतापर्यंत 1 लाख 27 हजार 259 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Updated: Jul 9, 2020, 08:31 PM IST
राज्यात दिवसभरात ६८७५ नव्या कोरोना रुग्णांची वाढ; २१९ जणांचा मृत्यू title=
संग्रहित फोटो

मुंबई : देशातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्र राज्यात आहे. आज गुरुवारी राज्यात 6875 नवे कोरोना रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 30 हजार 599 इतकी झाली आहे. 

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढत असल्याची दिलासादायक बाब आहे. आज दिवसभरात राज्यात 4067 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 1 लाख 27 हजार 259 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 55.19 टक्के इतकं झालं आहे.

आज एका दिवसांत राज्यात 219 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. आतापर्यंत एकूण 9667 जण दगावले आहेत. राज्यातील मृत्यूदर 4.19 टक्के इतका आहे. 

धारावीत गेले दोन दिवस केवळ एक आणि तीन रुग्ण आढळले होते. मात्र आज धारावीत नऊ कोरोना रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे धारावीतील एकूण रुग्णसंख्या 2347 इतकी झाली आहे. मुंबईत आतापर्यंत 89,124 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 60195 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मुंबईत एकूण 5132 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 23,785 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

सध्या राज्यात 6, 49, 263 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 48,191 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.