राज्यातील ७५०० ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील साडे सात हजार ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय. आज पहिल्या टप्प्यातील मतदानाला सकाळी ७.३० वाजता सुरुवात झाली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 7, 2017, 08:08 AM IST
राज्यातील ७५०० ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर  title=
संग्रहित छाया

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील साडे सात हजार ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय. आज पहिल्या टप्प्यातील मतदानाला सकाळी ७.३० वाजता सुरुवात झाली.

राज्यातील ७ हजार ५७६ ग्रामपंचायतींसाठी दोन टप्प्यात ७ आणि १४ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. यात ग्रामपंचायत सदस्यांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकीचाही समावेश आहे. पहिल्या टप्प्यात विविध १८ जिल्ह्यांतील ३ हजार ८८४, तर दुसऱ्या टप्प्यात १६ जिल्ह्यातील ३ हजार ६९२ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे.

सकाळी साडेत वाजता मतदानाला सुरुवात होणार असून साडेपाचपर्यंत मतदान करता येणार आहे. ९ ऑक्टोबरला पहिल्या टप्प्याची मतमोजणी होणार आहे. दरम्यान आज कोणत्या ग्रामपंचायतींसाठी मतदान होतंय त्यांची जिल्हानिहाय माहिती.

बीड जिल्ह्यात ६९० ग्राम पंचायती

बीड जिल्ह्यात ६९० ग्राम पंचायतसाठी आज मतदान होत आहे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे,विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे,माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर,सुरेश धस यांच्यासह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे,जनतेतून थेट सरपंच पदाची निवड होणार असल्याने या निवडणुकीला विधानसभे सारखे स्वरूप आले आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात २०० पोलीस कर्मचार्यांसह मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे,जिल्ह्यातील १०६ अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन लक्ष ठेवून आहे.

बुलडाणा जिल्ह्यात २५२ ग्रामपंचायती

बुलडाणा जिल्ह्यातील २५७ ग्रामपंचायतीपैकी २५२ ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक होत आहे. यंदा सरपंच थेट जनतेतून निवडल्या जाणार असल्याने ग्रामीण भागातील जनता तसेच प्रशासन सुद्धा सज्ज झालंय. मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनाने एस टी महामंडळाच्या बसची सुविधा कर्मचाऱ्यांना करून दिली आहे. गाव करी ते राव ना करी या म्हणीला दुजोरा देऊन बुलडाणा तहसीलदार सुरेश बगळे यांनी प्रत्येक मतदाराने आपल्या हक्काचे मत योग्य त्या व्यक्तीला देऊन लोकशाही मार्गाने आपला सरपंच निवडावा, असे आवाहन केले आहे.