मुख्यमंत्र्यांकडून हवामान खात्याच्या पाठीवर शाबासकीची थाप, म्हणाले...

हवामान खात्याने योग्य अंदाज वर्तवल्याने राज्य सरकारला चांगली तयारी करता आली

Updated: Jun 4, 2020, 01:21 PM IST
मुख्यमंत्र्यांकडून हवामान खात्याच्या पाठीवर शाबासकीची थाप, म्हणाले... title=

मुंबई: निसर्ग चक्रीवादळाच्या वाटचालीविषयी अचूक अंदाज देणाऱ्या हवामान खात्याच्या पाठीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाबासकीची थाप दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी कुलाबा वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दूरध्वनी करुन त्यांचे अभिनंदन केले. हवामान खात्याने योग्य अंदाज वर्तवल्याने राज्य सरकारला चांगली तयारी करता आली, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

 चक्रीवादळानंतर आता मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस

हवामान खात्याने अंदाज वर्तवल्याप्रमाणे बुधवारी निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकले होते. सुरुवातीला अलिबाग आणि नंतर मुंबईकडे सरकत असलेल्या या चक्रीवादळाचे क्षणाक्षणाचे अपडेटस हवामान खात्याच्या संकेतस्थळावर जाहीर केले जात होते. यामुळे प्रशासनासोबतच नागरिकांना पूर्वतयारी करण्यासाठी वेळ मिळाला होता.  त्यामुळे एरवी टिंगलटवाळीचा विषय असणाऱ्या हवामान खात्याचे अनेकांनी कौतुक केले होते. 
दरम्यान, या चक्रीवादळामुळे मान्सूनच्या महाराष्ट्रातील वाटचालीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वास कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केला. मान्सून कारवारपर्यंत दाखल झालाय. चक्रीवादळाचा जास्त परिणाम त्याच्या वाटचालीवर झालेला नाही. तो उत्तरेकडं सरकत आहे. २-३ दिवसांत मान्सून तळकोकणाकडे वाटचाल करेल, असे होसाळीकर यांनी सांगितले. 

मुंबादेवीची कृपा, विठु माऊलीचे आशिर्वाद; मुख्यमंत्र्यांकडून सर्वांचे आभार

तसेच मुंबईत आज सकाळपासून तसेच मुंबईत आज सकाळपासून ज्या तीव्रतेने पाऊस पडत आहे तसा पाऊस आगामी काळात पडणार नाही. आगामी महिन्यांत मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊसच पडेल. तसेच रायगड, ठाणे आणि नाशिकमध्ये फारसा पाऊस पडणार नाही, असेही होसाळीकर यांनी सांगितले.