भरती जितकी मोठी, तेवढीच मोठी ओहोटी येते; थोरातांचा भाजपला इशारा

आपण चुकीच्या वेळी भाजपमध्ये गेलो, आपण फसलो, अशी भावना त्यांच्या मनात आहे.

Updated: Dec 5, 2019, 08:09 PM IST
भरती जितकी मोठी, तेवढीच मोठी ओहोटी येते; थोरातांचा भाजपला इशारा title=

मुंबई: समुद्राला जितकी मोठी भरती येते तेवढीच ओहोटीही मोठी असते, असे सांगत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपला इशारा दिला. गेल्या काही दिवसांपासून भाजपमधील काही आमदार महाविकासआघाडीच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरु आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने महाभरती करुन काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांना पावन करुन घेतले होते. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

यावेळी त्यांनी म्हटले की, भाजपमध्ये ओहोटीची सुरुवात झाली आहे. भाजपमध्ये गेलेले अनेक आमदार अस्वस्थ आहेत. आपण चुकीच्या वेळी भाजपमध्ये गेलो, आपण फसलो, अशी भावना त्यांच्या मनात असल्याचा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला. आम्ही तुर्तास हे नेते काँग्रेसमध्ये परततील का, याची चर्चा केलेली नाही. मात्र, भाजपमधील अनेक जुनी मंडळीही अस्वस्थ आहेत, असे थोरात यांनी सांगितले.

'बरं झालं आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला'

मात्र, भाजप आमदार आशिष शेलार यांनी दावा फेटाळून लावला आहे.  भाजपमध्ये आधीपासून असलेले किंवा नव्याने आलेले आमदार पक्षाची शिस्त पाळणारे आहेत. त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळेच सत्तास्थापनेच्या आधी आम्हाला इतरांप्रमाणे आमदारांना डांबून ठेवावे लागले नाही. तर दुसरीकडे महाविकासआघाडीने आपल्या आमदारांना डांबून ठेवले. त्यांना मोठमोठी आश्वासने देण्यात आली. मात्र, आता प्रत्यक्षात काहीच घडत नाही. ही परिस्थिती पाहून आमच्याकडे आलेले आमदार 'बरे झाले आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला', असे म्हणत आहेत. त्यामुळे महाविकासआघाडीनेच आपल्या आमदारांच्या मनात काय चालले आहे, याचा कानोसा घ्यावा, असे शेलार यांनी सांगितले.