मुंबईत लोकलबाबत महत्वाची बातमी, मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आजपासून...

 Mumbai Local: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नागरिकांना आवाहन केले आहे. 

Updated: Oct 28, 2021, 11:25 AM IST
मुंबईत लोकलबाबत महत्वाची बातमी, मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आजपासून... title=
संग्रहित छाया

मुंबई : Mumbai Local: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नागरिकांना आवाहन केले आहे. कोरोनाचा धोका टळला असला तरी काळजी घेणे आवश्यक आहेत आहे. त्याचवेळी मुंबईकरांसाठी एक चांगली बातमी आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आजपासून पूर्ण क्षमतेने लोकलफेऱ्या सुरू केल्या आहेत. तर केवळ दोन डोस घेतलेल्यांनाच लोकल प्रवासाची मुभा असणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही नियम लागू करण्यात आले आहेत.

दरम्यान, कोरोना कालावधी आणि लॉकडाऊनपूर्वी चालणाऱ्या फेरींची संख्या लक्षात घेता, आजपासून सर्वच फेऱ्या पूर्ववत सुरू झाल्या आहेत. सद्यस्थितीत मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर लोकलच्या  1686 फेऱ्या धावत होत्या. त्यात वाढ करण्यात आली आहे. आता पूर्ण क्षमतेने गाड्या चालविण्यात येणार आहेत. आता फेऱ्यांची संख्या 1700च्या पुढे गेली आहे.

मुंबईत मध्य आणि पश्चिम लोकल रेल्वे आजपासून 100 टक्के फेऱ्या सुरू झाल्या आहेत. मध्य रेल्वे वर आता लोकलच्या 1702 फेऱ्या सूरु आहेत त्या आता 1774  होणार आहे. पश्चिम रेल्वे आता 1304फेऱ्या सुरू आहेत 1367 होणार आहे.

पश्चिम रेल्वेत 95 टक्के क्षमतेनं लोकल सुरु

आतापर्यंत मध्य रेल्वेवर 95 टक्के फेऱ्या कोरोना कालावधी आणि लॉकडाऊनच्या आधी सुरू करण्यात आल्या आहेत. कोरोना कालावधीपूर्वी मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, येथे 1774 फेरी होत्या. पश्चिम रेल्वे ट्रॅकवर लोकल फेरीबद्दल बोलायचे झाले तर येथे 99 फेऱ्या वाढवण्यात आल्या होत्या. यामुळे फेरींची संख्या 1201 वरून 1300 पर्यंत वाढली. कोरोना कालावधीपूर्वी या फेरींची संख्या 1367 असायची. म्हणजेच, पश्चिम रेल्वेनेही 95 टक्के क्षमतेने लोकल सेवा सुरु केली आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन 

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं नागरिकांना आवाहन केलंय. कोरोनाचा धोका टळला असला तरी काळजी घेणं आवश्यक आहेत, त्यामुळे लोकांनी फटाके फोडणं टाळावं असं आवाहन सरकारने केले आहे. कोरोना झालेल्या आणि होऊन गेलेल्या नागरिकांना फटाक्यांच्या धुरामुळे त्रास होण्याची भीती आहे. त्यामुळे दिव्यांची आरास करून यंदाची दिवाळी साजरी करावी असं सरकारनं म्हंटले आहे.

मुंबईत पालिकेच्या माध्यमातून वेगाने लसीकरण 

मुंबईतल्या जंबो केअर सेंटरवरच्या खर्चाला आवर घालण्याचा निर्णय घेतलाय. सेंटरमध्ये क्षमतेच्या दहा टक्केही रुग्ण नाहीत. त्यामुळे सर्व रुग्णांना एकाच विभागात दाखल करणार आहे. त्यामुळे मनुष्य बळावरचा ताणही कमी होईल आणि खर्चालाही आवर घालता येईल. 

मुंबईत महापालिकेच्या माध्यमातून वेगाने लसीकरण मोहीम सुरु करण्यात आलीये. ‘माझी सोसायटी, जबाबदार सोसायटी’ उपक्रमा अंतर्गत मुंबईतील दहा हजार सोसायट्यांमध्ये लसींचे  दोन्ही डोस  देण्यात आलेत. लसीकरण पूर्ण झालेल्या सोसयायटीमध्ये भित्तीपत्रकं लावण्यात येत आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात 16 हजार 156 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. 733 जणांचा कोरोनाने मृत्यू झालाय. सध्या देशात 1 लाख 60 हजार 989 सक्रीय रुग्ण आहेत.