महाराष्ट्रातील कोरोनाच्या मृतांचे लपवलेले आकडे अखेर समोर आलेच- फडणवीस

कोरोना साथीमुळे झालेले मृत्यू जाहीर करण्यापूर्वी प्रत्येक प्रकरण हे मुंबई महापालिकेने गठीत केलेल्या ‘डेथ ऑडिट कमिटी’कडे जाते. 

Updated: Jun 16, 2020, 07:59 PM IST
महाराष्ट्रातील कोरोनाच्या मृतांचे लपवलेले आकडे अखेर समोर आलेच- फडणवीस title=

मुंबई: महाराष्ट्रात प्रशासकीय यंत्रणांनी कोरोनाच्या मृत्यूचे दडवून ठेवलेले आकडे अखेर समोर आले आहेत. मात्र, आता या प्रक्रियेला फेरतपासणीचे गोंडस नाव देण्यात आले आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून मृतांची खरी आकडेवारी लपवणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

मुंबईत यायचंही धाडस नाही- नितीन गडकरी

देवेंद्र फडणवीस यांनी कालच ICMRच्या दिशानिर्देशांचे पालन न करता राज्यातील कोरोनाच्या मृतांचा खरा आकडा लपवला जात असल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही पाठवले होते. यानंतर आज प्रशासकीय यंत्रणांकडून मुंबईतील ८६२ आणि राज्यातील ४६६ कोरोना मृतांचे आकडे नव्याने जाहीर करण्यात आले. त्यामुळे आता राज्यातील कोरोना मृतांच्या आकडेवारीत १३२८ जणांची भर पडली आहे. त्यामुळे अखेर सत्य समोर आलेच. आता सरकारने दोषींवर कठोर कारवाई करावी, असे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

अरे देवा... गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू

कोरोना साथीमुळे झालेले मृत्यू जाहीर करण्यापूर्वी प्रत्येक प्रकरण हे मुंबई महापालिकेने गठीत केलेल्या ‘डेथ ऑडिट कमिटी’कडे जाते. या समितीने प्रत्येक प्रकरणावर शिक्कामोर्तब केल्यानंतरच तो मृत्यू कोरोनामुळे झाला, असे जाहीर केले जाते. मात्र, या समितीने आयसीएमआरच्या गाईडलाईन्स डावलून काही कोरोना मृतांचे आकडे दडवले होते. ‘डेथ ऑडिट कमिटी’ने कोणाच्या दबावाखाली हे कृत्य केले, असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला होता.