'खरी शिवसेना कोणाची, जनतेने निकाल दिलाय' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल

Shivsena Vardhapan Din : शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्ताने आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाची अॅलर्जी असल्याचा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला. 

राजीव कासले | Updated: Jun 19, 2024, 09:36 PM IST
'खरी शिवसेना कोणाची, जनतेने निकाल दिलाय' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल title=

Shivsena Vardhapan Din : शिवसेनेचा आज 58 वा वर्धापन दिन आहे.  यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Ekanth Shinde) शिवसेनेचा मेळावा वरळीच्या NSCI मध्ये साजरा केला जातोय. या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरुन उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. शिवसेना महाराष्ट्रात वाढली, ठाणे, कोकण, संभाजीनगर हे शिवसेनेचे बालेकिल्ले अबाधित राहिलेत. कोणी म्हणत होतं ठाणे, कल्याणमध्ये शिवसेनेचा पराभव होईल, पण दोन लाखांपेक्षा जास्त मताधिक्क्याने विजय मिळवला. हा विजय घासून फुसून नाही तर ठासून विजय आहे. कोकात ठाकर सेनेला एकही जागा जिंकता आलेली नाही असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय.

शिवसेनेच्या हक्काच्या मतदारांनी आपल्या शिवसेनेवर विश्वास ठेवला आहे. शिवसेनेवर भरभरून प्रेम करणाऱ्या मतदारांचं मनापासून आभार मानतो. काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी दोन वर्षांपूर्वी उठाव केला तो खऱ्या अर्थाने या निवडणूकीत जनतेने शिक्कामोर्तब केलं. हा निर्णय कसा योग्य होता हे दाखवून दिलंय. 

वारसा सांगणाऱ्यांना आज हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटू लागली आहे. त्यांना हिंदूत्वाची अॅलर्जी आली आहे. शिवतीर्थावर भाषण करताना देखील संपूर्ण इंडिया आघाडी होती. आज वर्धापण दिनीही तमाम हिंदू बांधव म्हणण्याची त्यांना हिंमत नव्हती. बाळासाहेबांचा फोटो लावून मतं मागण्याचा त्यांना अधिकार नाही, असा हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं नाव न घेता केला. म्हणून धनुष्यबाण पेलण्याची ताकत मनगटात लागते ती ताकद आपल्या धनु्ष्यबाणात आहे. म्हणून लोकांनी आपल्यावर लोकांनी विश्वास दाखवला. लोकसभेच्या सात जागा आपण जिंकलो, आपण आणखी तीन चार जागा नक्की जिंकलो असतो. माझा आत्मविश्वास होता. पण आता मागचं सगळं विसरुन महायुती मजबूत करायची आहे असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय. 

खरी शिवसेना कोणाची हे जनतेने या निवडणुकीत दाखवून दिलं आहे, शिवसेनेचे मूळ मतदारांपैकी 19 टक्के मतं मिळाली तर चार टक्के मत त्यांच्याकडे राहिली. मग त्यांचे उमेदवार कसे निवडून आले हे सर्वांना माहित आहे. पण ठाकरेंची हा विजय तात्पूरती सूज आहे. पण सूज काही काळाने उतरते असा टोला शिंदे यांनी लगावला.

तेरा जागा शिंदे गट आणि उबाठा समोरासमोर लढले त्यात सात जागा आपण जिंकलो. आपला स्ट्राईक रेट 47 टक्के आहे. तर त्यांचा स्ट्राईक रेट आहे 42 टक्के. त्यांना तेरा जागेवर 7 लाख मतं मिळाली. तर आपल्या तेरा उमेदवारांना 62 लाखं मतं मिळाली अशी आकडेवारीही मुख्यमंत्री शिंदे यांनी मांडली. त्यामुळे त्यांच्यापेक्षा खरी शिवसेना कोण हे हे स्पष्ट झालं आहे.