मुंबई महापालिकेचा प्रताप, निलंबित कर्मचाऱ्यांना पुन्हा घेतलं सेवेत

गैरकारभार केला म्हणून काढलं, मग पु्न्हा नोकरीत घेतलं

Updated: Dec 16, 2021, 05:59 PM IST
मुंबई महापालिकेचा प्रताप, निलंबित कर्मचाऱ्यांना पुन्हा घेतलं सेवेत title=

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा (Mumbai Municipal Corporation) एक प्रताप समोर आला आहे. विविध कारणांसाठी निलंबित केलेल्या तब्बल 117 कर्मचाऱ्यांना मुंबई महापालिकेने पुन्हा सेवेत घेतलं आहे. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी मनुष्यबळाचा तुटवडा असल्याचं कारण यासाठी मुंबई महापालिकेने (BMC) पुढे केलं आहे.

लाचखोरी प्रकरणात तसंच गैरकारभार, बेजबाबदारपणाचा ठपका ठेवत या सर्वांना निलंबित करण्यात आलं होतं. पण कोवीड ड्युटीच्या नावाखाली मे 2020 मध्ये या सर्वांना कामावर परत घेण्यात आलं आहे. विशेष म्हणजे कमला मील आग दुर्घटना प्रकारणाती 2 दोषी निलंबित अधिकाऱ्यांचाही यात समावेश आहे. 

कोविड  संकटावेळी मनुष्यबळाची कमतरता भासत असल्याने आरोग्य विभागाशी संबंधित निलंबित अधिकाऱ्यांना परत घेण्याकरता आयुक्तांनी आदेश दिले होते. मात्र आरोग्य विभागासोबतच इतर सर्व विभागातील निलंबीत कर्चाऱ्यांचंही निलंबन रद्द करून त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. 

यात आरोग्य विभागातून 17 तर तीन वेगवेगळ्या रुग्णालयातील 6 जणांना परत कामावर घेतलं गेलं आहे. घनकचरा विभागातून 53, मुख्य अभियंता विभागातून 23, पाणी, सुरक्षा आणि अग्निशामक विभागातून प्रत्येकी 6 निलंबित कर्मचाऱ्यांना सेवेत रुजु करुन घेण्यात आलं आहे. जितेंद्र घाटगे यांनी आरटीआयअंतर्गत ही माहिती मिळवली आहे.