नेहमीप्रमाणे मुंबईला तुंबई म्हणून बदनाम करणार आहात का? नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

पावसाळ्यात यंदाही मुंबईची होणार तुंबई? आमदार नितेश राणे यांचा मुंबई महापालिकेवर निशाणा

Updated: May 16, 2022, 03:46 PM IST
नेहमीप्रमाणे मुंबईला तुंबई म्हणून बदनाम करणार आहात का? नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र title=

मुंबई :  यंदाच्या वर्षी मान्सून काही दिवसांपूर्वीच राज्यात दाखल होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार अंदामानात (andaman and nicobar) मान्सून दाखल झाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून अंदमानात 22 मे रोजी दाखल होणार होता. मात्र यंदा हा मान्सून (Monsoon 2022) सहा दिवस आधीच म्हणजे 16 मे रोजी दाखल झाला आहे.

दरम्यान, अतिवृष्टीमुळं जून महिन्यातच मुंबई (Mumbai) एकदोन नव्हे, तर तब्बल 6 वेळा पाण्याखाली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार पावसाळ्यामध्ये 17 वेळा साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यावरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीलं आहे. यात त्यांनी 26 जुलैच्या परिस्थितीचीही आठवण करुन दिली आहे. 

पत्रात नितेश राणे काय म्हणालेत?
प्रति,
मा.मु. उद्धव ठाकरे साहेब.
मुंबई, महाराष्ट्र.

पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते अशीच मुंबईची ओळख सातत्यानं प्रसारमाध्यमे देतात.  परंतु या तुंबलेल्या मुंबईत अनेकांनी आपले हकनाक जीव गमावले तरीही त्यावर ठोस उपाययोजना म्हणून मुंबई महापालिकेत  दिर्घकाळ सत्ता भोगणारी शिवसेना मात्र काहीही करू शकलेली नाही. 

मुंबईला नुसती ठेकेदारांच्या फायद्यासाठी रंगरंगोटी आणि देखावा करून गतवैभव प्राप्त होणार नाही.त्यासाठी जनतेच्या मुळ समस्येकडेपण लक्ष दिले पाहिजे. यावर्षी चांगला पाऊस होण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. 

त्यामुळे पावसाळ्यात मुंबईची काय परिस्थिती असेल याची कल्पना करवत नाही. तुंबणाऱ्या या मुंबईत 386 असे धोक्याचे ठिकाणं आहेत. ज्याला आपण फ्लडींग पॉईंटस म्हणतो. यापैकी 28 ठिकाणं एकाच पश्चिम विभागतील आहेत. फक्त मांटुंगा,वडाळा, सायन भागतच यातील 25 फ्लडींग पॉईंट्स आहेत. यंदाच्या पावसाळ्यात समुद्राला 22 दिवस भरतीही असणार आहे. त्यामुळे मुंबईत सलग 250  मिली पेक्षा अधिक पाऊस पडला तर मुंबईला 26 जुलैच्या परिस्थितीची आठवण येईल का काय? अशी भिती व्यक्त केली जातेय. 

पावसाच्या पाण्याचा निचरा या फ्लडींग पॉईंट्स येथून झाला नाही तर मुंबईकरांना भीषण परिस्थितीचं तोंड द्यावं लागेल. या फ्लडींग पाईंट्स इथं पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप लावण्याच्या पलिकडे आपण काय उपाय योजना केल्या आहेत? हे आम्हा जनतेस कळाले पाहिजे. 

राज्य सरकार व पालिका प्रशासन या संवेदनशील मुद्यावर विविध विभागांचे मत लक्षात घेता काही धोरण आखणार आहे का? तेथील नागरिकांना अशा संभाव्य आपतीजन्य परिस्थिती काय उपाययोजना करायच्या असतात या विषयी आपण काही जनजागरण केलं आहे का? या सर्व प्रश्नांची आपण समाधान साधणार आहात की नेहमीप्रमाणे मुंबईला तुंबई म्हणून देश व जागतिक स्तरावर बदनाम करणार आहात, असा टोला नितेश राणे यांनी लगावला याहे.