एकदोन नव्हे, मुंबईत तब्बल 13 दिवस पाणीकपात; तारखा आताच पाहून घ्या

Mumbai News : पाहुण्यांचा राबता वाढण्याच्या काळातच मुंबई प्रशासनाकडून पाणीकपातीचा निर्णय. पाहा किती दिवसांसाठी सोसावा लागणार त्रास...   

सायली पाटील | Updated: Nov 17, 2023, 07:40 AM IST
एकदोन नव्हे, मुंबईत तब्बल 13 दिवस पाणीकपात; तारखा आताच पाहून घ्या  title=
Mumbai news water shortage in city from 20 nov to 2 december

Mumbai News : दिवाळी आणि सणासुदीचे दिवस आता मागे सरत असतानाच अनेकांनीच पर्यटनाचे बेत आखण्यास सुरुवात केली आहे. पाहुण्यांकडच्या भेटीगाठीसुद्धा आता वाढणार आहेत. मुंबईकरांची घरंसुद्धा पाहुण्यांनी बहरून जातील. पण, या साऱ्यामध्ये तुमची चिंता वाढवणार आहे ती म्हणजे पाण्याची बातमी. कारण, शहरात एकदोन नव्हे, तर तबब्ल 13 दिवसांसाठी पाणीकपात लागू करण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतला आहे. 

पिसे-पांजरपोळ जलशुद्धीकरण केंद्रात असणाऱ्या दुरुस्तीकामामुळे मुंबईत 20 नोव्हेंबरपासून 2 डिसेंबरपर्यंतच्या कालावधीत दहा टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. मुंबईतील या पाणीकपातीचा परिणाम ठाणे आणि भिवंडीतील पाणीपुरवठ्यावरही होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कशी असेल कामाची रुपरेषा

मुंबई शहराला केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यापैकी 55 टक्के पाणीपुरवठा पिसे- पांजरपोळ जलशुद्धीकरण केंद्रातून केला जातो. तिथंच हे काम हाती घेण्यात येणार असून शहरातील नागरिकांना पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरदरम्या मुंबई शहर आणि उपनगरात राहणाऱ्या 24 विभागांमधील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि पाण्याचं नियोजन करावं असं आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 

हेसुद्धा वाचा : Indian Railways चं तिकीट बुक करताच मिळणार कन्फर्म सीट; पाहा कसा मिळेल फायदा 

मुळात पाणीप्रश्न समोर उभा राहिला की अनेकांचेच धाबे दणाणतात. त्यात सध्याचा सुट्ट्यांचा माहोल आणि घरी सुरु असणाऱी पाहुण्यांची ये-जा पाहता पाणी जपून वापरण्याचाच मंत्र कायम लक्षात ठेवणं अपेक्षित असेल. किंबहुना पाहुणे मंडळींनाही अशी विनंती करणं वावगं ठरणार नाही. त्यामुळं पाणीकपातीसंदर्भातील या निर्णय़ाकडे गांभीर्यानं पाहा आणि सदनिकांमधील कार्यकारिणीकडूनही रहिवाशांना तशी कल्पना द्या.