नवी मुंबईत कोंबडी चोरांना पकडण्यासाठी गेलेल्या तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला; गावाबाहेरच घेतला जीव

Navi Mumbai Crime: चोरट्यांचा पाठलाग करण्याच्या नादात या तरुणाचा नाहक बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी गावातीलच ेका बेकरीत काम करत होते

Updated: Apr 3, 2023, 05:22 PM IST
नवी मुंबईत कोंबडी चोरांना पकडण्यासाठी गेलेल्या तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला; गावाबाहेरच घेतला जीव title=

स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : नवी मुंबई (Navi Mumbai News) आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्याच्या (Crime News) घटनांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच गेल्या महिन्यात 29 मार्च रोजी झालेल्या प्रकाराने सर्वांनाच धक्का बसला आहे. कोंबडी (chicken) चोरायला आलेल्या आरोपींनी घरात झोपलेल्या एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. नवी मुंबई पोलिसांनी (Navi Mumbai Police) याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. चोरट्यांचा पाठलाग करण्याच्या नादात या तरुणाचा नाहक बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

गेल्या आठवड्यात जिभेचे चोचले पुरवण्यासाठी रात्री दोन वाजता तिघेजण नवी मुंबईच्या शिवकर गावात फिरत होते. यावेळी त्यांनी कोंबडी चोरण्याचा निर्णय घेतला. रात्रीच्या अंधारात तिघेजण गावात बाहेर जाळ्यात ठेवल्या जाणाऱ्या कोंबड्यांच्या शोधात 19 वर्षीय विनय पाटील या तरुणाच्या घराजवळ गेले. मात्र घराच्या दरवाजाची कडी लावली नसल्याने चोरांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. आत डोकावून बघितल्यावर त्यांची घरातल्या काही वस्तूंवर नजर पडली. त्या वस्तू आरोपींनी चोरण्याचा प्रयत्न केला असता झोपलेल्या विनयला जाग आली. विनयला पाहताच आरोपींनी तिथून पळ काढला.

दुसरीकडे विनयने थेट कुऱ्हाड घेतली आणि आरोपींचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. शेवटी गावाच्या बाहेर काही अंतरावर जाताच त्या तिघांसोबत विनयची झटापट झाली. आरोपींनी विनयवर त्याच कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात विनय गंभीर जखमी होऊन खाली पडला. त्यामुळे आरोपींनी तिथून पळ काढला. काही वेळानंतर विनयच्या घरच्यांना जाग आल्यानंतर त्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र बऱ्याच वेळानंतर गावाच्या बाहेर विनय गंभीर जखमी अवस्थेत आढळला. विनयच्या कुटुंबियांनी त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी विनयला मृत घोषित केले.

यानंतर पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू करत तीन आरोपींना अटक केली आहे. चौकशीमध्ये तिघेही गावातीलच एका बेकरीत काम करणारे असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी कसून चौकशी केली असता आपणच विनयला मारल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. दुसरीकडे एका कोंबडीच्या चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरांकडून एका तरुणाचा नाहक जीव गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी काय सांगितले?

"शिवकर गावात एका तरुण मुलाचा खून करण्यात आला आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये गुन्हे शाखेच्या पथकाने तीन आरोपींना अटक केली आहे. यामध्ये मयत तरुण रात्री घरी झोपलेला असताना त्याच भागातील तीन जण कोंबडी चोरण्यासाठी आले होते. त्यावेळी मृत तरुणाला जाग आली आणि तो कुऱ्हाड घेऊन आरोपींच्या मागे लागला. यावेळी झालेल्या झटापटीमध्ये त्याच्या कुऱ्हाडीने वार करुन तरुणाचा खून करण्यात आला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे आणि तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना अटक केली आहे," अशी माहिती परिमंडळ 2चे उपायुक्त, पंकज डहाने यांनी दिली.