Salman Khan च्या जीवावर का उठलीय लॉरेन्स बिश्नोई गँग? जाणून घ्या Inside Story

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळा झाडून हत्या करण्यात आली. यानंतर रविवारी लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्विकारली. सोशल मीडियावर पोस्टमध्ये लिहिलंय की, सलमान खानमुळे....  

नेहा चौधरी | Updated: Oct 13, 2024, 01:38 PM IST
Salman Khan च्या जीवावर का उठलीय लॉरेन्स बिश्नोई गँग? जाणून घ्या Inside Story title=
Why has Lawrence Bishnoi gang attacked Salman Khan Know Inside Story

Baba Siddique Salman Khan Connection : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँग असल्याच समोर आलं आहे. लॉरेन्स बिश्नोई गँग शुब्बु लोणकर याने फेसबुक पोस्टमध्ये या हत्येची जबाबदारी स्विकारली आहे. या पोस्टमध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे की, सलमान खानसोबतची बाबा सिद्दीकींची जवळीक त्यांना महागात पडली आहे. त्यासोबत या पोस्टमधून त्यांनी इशारा दिलाय की, जे लोक सलमान खान आणि दाऊद गँगची मदत करतील त्यांना हिशोब चुकता करावा लागेल. (दरम्यान या पोस्टची पुष्टी झी २४ तास घेत नाही.) (Why has Lawrence Bishnoi gang attacked Salman Khan Know Inside Story)

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय. यापूर्वी सलमान खानला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) आणि गँगस्टर गोल्डी बराडने (Goldie Brar) धमकी दिली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँग सलमान खानच्या जीवावर का उठली आहे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. 

दरम्यान गेल्या महिन्यात बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचे वडील सलीम खान यांना जाहीरपणे धमकावल्याची घटना समोर आली आहे. 19 सप्टेंबर बुधवारी सकाळी सलीम खान बँडस्टँडमध्ये मॉर्निंग वॉक करत असताना ही घटना घडली. त्याच दरम्यान स्कूटरवरून एक तरुण आणि बुरखा घातलेली एक महिला तेथे आली आणि सलीम खान यांना विचारले की लॉरेन्स बिश्नोईला पाठवू का?

कोण आहे लॉरेन्स बिश्नोई?

लॉरेन्स बिश्नोई हा कुख्यात गँगस्टर (Gangstar) असून सध्या तो तिहार जेलमध्ये बंद आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या नावावर अनेक गुन्हे दाखल आहेत. इतकंच नाही तर तो तुरुंगातून आपली गँग चालवतोय. तुरुंगाबाहेर ही गँग सध्या गोल्डी बराड आणि त्याचा मामेभाऊ सचिन बिश्नोई चालवतायत. हे दोघंही सध्या कॅनडात लपलेत. याशिवाय ऑस्ट्रीयामधून अनमोल आणि कॅनडातून विक्रम बराड आर्थिक देवाण-घेवाणाची कामं सांभाळतात. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लॉरेन्स बिश्नोई गँगशी जवळपास एक हजार तरुण जोडले गेलेत. यात शार्फ शुटर्स, कॅरिअर, सप्लायर, रेकी करणारे, शेल्टर मॅन आणि सोशल मीडिया विंगचे सदस्य सहभागी आहेत. गेल्या वर्षी झालेल्या पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगचा सहभाग असल्याचं समोर आलं होतं. 

 

हेसुद्धा वाचा - Baba Siddique Net worth : बाबा सिद्दीकींची हत्या संपत्तीच्या वादातून? आलिशान कार, महागडे दागिने अन् जमीन; संपत्ती नेमकी किती?

 

काळवीट आणि बिश्नोई समाज

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हा बिश्नोई समाजाचा आहे. हा समाज राजस्थानमधल्या जोधपूरजवळच्या थार वाळवंटाशी संबंधीत आहे. हा समाज नैसर्गिक गोष्टींवर प्रेम करणारा आहे, विशेष म्हणजे प्राण्यांना हा समाज देव मानतो. त्यातही हरिण हा प्राणी त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. काळवीटाची ते पूजा करतात. त्यामुळेच हरणाच्या रक्षणासाठी हा समाज आपल्या जीवाचीही बाजी लावताना दिसतो. राजस्थानमधल्या काही गावात तर महिला हरिणाच्या बछड्यांना आपलं दूध पाजतात. 

बिश्नोई समाजाचे नियम

प्राण्यांचं रक्षण करताना मृत्यू आल्यास बिश्नोई समाजात त्या व्यक्तीला शहीदांचा दर्जा दिला जातो.  प्राण्यांच रक्षण करणं, हिरवीगार झाडं न तोडणं असे काही नियम या समाजाने आखले आहेत. त्यातली काळविटाला या समाजात देवाचं स्थान आहे. जोधपुरच्या राजाने झाडं कापण्याचा आदेश दिल्यानंतर बिश्नोई समाजाने झाडांना मिठी मारत आंदोलन केलं होतं. यात जवळपास 363 बिश्नोई समाजातील लोकांचा मृत्यू झाला होता.

 

हेसुद्धा वाचा - सलमान खानसोबतची मैत्री भोवली? लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकींच्या हत्येसंदर्भात पोस्ट करत म्हटलं...

 

सलमानला धमकी देण्याचं कारण

1998 मध्ये सलमान खानने काळविटाची शिकार केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. तेव्हापासून बिश्नोई समाज सलमान खानच्या विरोधात आहेत. त्याच्या चित्रपटांवरही बहिष्कार घातला जातो, इतकंच काय तर त्याची गाणीही या समाजातील लोकं ऐकत नाहीत. हा समाज दुर्बल मानला जात असल्याने त्यांनी सलमानविरुद्ध आजपर्यंत आवाज उठवला नव्हता. पण गुन्हेगारीच्या जगतात लॉरेन्स बिश्नोईचं नाव चर्चेत आलं आणि त्याने थेट सलमानलाच जीवे मारण्याची धमकी दिली. 

सलमानच्या घराची रेकी

जून 2021 मध्ये पोलिसांच्या तपासाता एक धक्कादायक खुलासा झाला होता. सलमान खानाल मारण्यासाठी लॉरेन्स बिश्नोईने राजस्थानमधला कुख्यात गुंड संपत नेहरावर जबाबदारी सोपवली होती. यानंतर संपत नेहराने मुंबईत येऊन सलमानच्या घराची रेकीदेखील केली होती. सलमानला मारण्यासाठी संपत नेहराने स्प्रिंग रायफल मागवली होती. सुदैवाने पोलिसांना याचा सुगावा लागला आणि संपत नेहराला अटक करण्यात आली. 

काय आहे काळविट शिकार प्रकरण?

1998 च्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात जोधपूरमध्ये हम साथ साथ है या चित्रपटाचं शुटिंग सुरु होतं. या शुटिंगदरम्यान सलमान खान आपल्या काही सहकलाकारांबरोबर भवाद गावाजवळ शिकारीसाठी गेला होता. 27-28 सप्टेंबर 1998 च्या रात्री घोडा फार्म हाऊसजवळ एका काळविटाची शिकार करण्यात आली. याचा आरोप सलमान खानवर करण्यात आला आणि त्यासाठी त्याला दोषी ठरवण्यात आलं. याप्रकरणात सलमानला चारवेळा तुरुंगात जावं लागलं आणि प्रत्येकवेळी जामिनावर तो बाहेर आला.