अजय-शाहरुखनं वाद संपवून घेतली एकमेकांची गळाभेट

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि अजय देवगण यांच्यात दोन वर्षांपूर्वी आपल्या फिल्म रिलीजच्या तारखांवरून झालेला वाद उघडपणे समोर आल्यानंतर या दोघांनीही एकमेकांसमोर येणं टाळलं... पण, आता मात्र त्यांनी एकमेकांची गळाभेट घेत आपल्यातील वादाला सोडचिठ्ठी दिल्याचं दाखवून दिलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 11, 2014, 09:06 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि अजय देवगण यांच्यात दोन वर्षांपूर्वी आपल्या फिल्म रिलीजच्या तारखांवरून झालेला वाद उघडपणे समोर आल्यानंतर या दोघांनीही एकमेकांसमोर येणं टाळलं... पण, आता मात्र त्यांनी एकमेकांची गळाभेट घेत आपल्यातील वादाला सोडचिठ्ठी दिल्याचं दाखवून दिलंय.

अजयची पत्नी काजोल हिच्यासोबत चांगली मैत्री असली तरी फार गाढ मैत्रीचे संबंध शाहरुख आणि अजय या दोघांत कधीच नव्हते... पण, दोन वर्षांपूर्वी शाहरुखची ‘जब तक है जान’ आणि अजयचा ‘सन ऑफ सरदार’ एकाच दिवशी प्रदर्शित होणार होते. आणि अजयनं, शाहरुख खान आणि ‘जब तक है जान’चे निर्माते यशराज बॅनरनं आपल्या प्रभावाचा वापर करून जास्तीत जास्त सिनेमागृहांवर वर्चस्व मिळवलंय, असा आरोप केला होता. यावरून, या दोघांमध्ये उघड उघड झालेले वाद मीडियासमोर आले होते.
पण, नुकतंच अजय देवगन रोहित शेट्टी दिग्दर्शित सिनेमा ‘सिंघम-2’चं शूटींग करत असताना सेटवर शाहरुख खान दाखल झाला. सेट वर शाहरुख खान मित्र आणि ‘चेन्नई एक्सप्रेस’ सिनेमाचा दिग्दर्शक रोहीत शेट्टी आणि करीना कपूर हेदेखील उपस्थित होते.
जसा शाहरुख उपस्थितांजवळ पोहचला... त्याचं पहिल्यांदा लक्ष अजयकडे गेलं... आणि त्यानं हसतमुखानं अजयची गळाभेट घेतली... आणि मग दोघांत बराच वेळ गप्पाही सुरु होत्या.
या सगळ्यामध्ये रोहीत शेट्टीही खुश झाला कारण, त्याचे दोन आवडते स्टार्स एकमेकांशी असलेले वाद संपवून पुन्हा एकत्र आले होते. तसंच आपला पती आणि मित्र यांच्यातील वाद संपल्यानं काजोललाही नक्कीच आनंद होईल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.