देशात हागणादारीमुक्त शहरांसाठी महाराष्ट्राचा पहिला नंबर

केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या देशातील पहिल्या १० हागणदारीमुक्त शहरांच्या यादीत महाराष्ट्रातल्या ५ शहरांचा समावेश असल्याचा आनंद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. सोबतच हे अभियान यशस्वीपणे राबविणाऱ्या राज्यातील यंत्रणेचंही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलंय. 

Updated: Aug 31, 2016, 06:09 PM IST
देशात हागणादारीमुक्त शहरांसाठी महाराष्ट्राचा पहिला नंबर  title=

मुंबई : केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या देशातील पहिल्या १० हागणदारीमुक्त शहरांच्या यादीत महाराष्ट्रातल्या ५ शहरांचा समावेश असल्याचा आनंद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. सोबतच हे अभियान यशस्वीपणे राबविणाऱ्या राज्यातील यंत्रणेचंही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलंय. 

हीच ती पाच शहरं... 

हागणदारीमुक्त झालेल्या देशातील पहिल्या १० शहरांची यादी केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने जाहीर केली आहे. त्यात राज्यातील कागल, मुरगूड, पन्हाळा (जि.कोल्हापूर), वेंगुर्ला (जि.सिंधुदुर्ग), पाचगणी (जि.सातारा) या पाच शहरांचा समावेश आहे. 

राज्यस्तरीय यंत्रणेकडून याबाबतच्या कार्यवाहीचे मूल्यांकन झाल्यानंतर केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या त्रयस्थ संस्थेकडून तपासणी झाल्यानंतर ही शहरे हागणदारीमुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आलंय. यानंतरच्या टप्प्यात राज्यातील १० शहरांची या संस्थेकडून तपासणी सुरु आहे. येत्या २ ऑक्टोबरपर्यंत राज्यातील १०० शहरे हागणदारीमुक्त होणार आहेत. राज्यात नगरविकास विभागाकडून या अभियानाची काटेकोर आणि प्रभावी अंमलबजावणी सुरु असल्याने पुढील वर्षात पूर्ण नागरी भाग हागणदारीमुक्त होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकलं गेलं आहे.

महाराष्ट्र अव्वल

ग्रामीण महाराष्ट्रातही स्वच्छता अभियानाची चांगली अंमलबजावणी होत असून त्यातही महाराष्ट्र हे देशात अव्वल ठरले आहे. राज्यातील जवळपास ७ हजार गावे हागणदारीमुक्त झाली असूर राज्याच्या शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांत स्वच्छता अभियानाला मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे.

पंतप्रधानांचे आभार 

मुख्यमंत्र्यांनी या कामगिरीबद्दल विशेष आनंद व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. पंतप्रधानांच्या द्रष्टेपणामुळे स्वच्छ भारत अभियान हे देशातील एक प्रमुख जनआंदोलन झाले असल्याचे प्रशंसोद्गार काढतानाच राज्यातील हागणदारीमुक्त झालेल्या शहरांसह अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेचेही त्यांनी अभिनंदन केले आहे.

केंद्र सरकारकडून देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. राज्यात या अभियानाची अतिशय प्रभावीपणे अंमलबजावणी होत असून २ ऑक्टोबर २०१५ पासून राज्याच्या नागरी भागात त्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याअंतर्गत नागरी भागातील २६ महानगरपालिका, २२६ नगरपरिषदा आणि १२० नगरपंचायती २ ऑक्टोबर २०१७ पर्यंत हागणदारीमुक्त करण्यात येणार आहेत.