सहा तासांच्या खोळंब्यानंतर रेल्वे धावली; रिक्षा-टॅक्सीवाल्यांकडून प्रवाशांची लूट

कल्याण-ठाकूर्ली दरम्यान पेंटाग्राफ तुटल्याने आधीच गोंधळ उडाला असताना दिवा येथे संतप्त प्रवाशांनी रेल रोको आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी थेट लाठीचार्ज केल्याने संतप्त लोकांनी दगडफेक करत जाळपोळ केली. यावेळी एक गाडी पेटवून दिली.

Updated: Jan 2, 2015, 05:18 PM IST
सहा तासांच्या खोळंब्यानंतर रेल्वे धावली; रिक्षा-टॅक्सीवाल्यांकडून प्रवाशांची लूट title=

दुपारी २. १० वाजता

आजची घटना दुर्दैवी, चौकशीचे आदेश दिले आहेत - रेल्वेमंत्री सुरेश प्रभू

मध्य रेल्वेवरील आजची घटना दुर्दैवी आहे. उपनगरीय सेवेकडे आत्तापर्यंत दुर्लक्ष झाले आहे. उपनगरीय रेल्वेच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नियोजित आराखडा तयार करु.

दुपारी २. ०० वाजता

मी मुख्यमंत्री, खासदार यांच्याशी चर्चा केली. लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यावर माझा भर - रेल्वेमंत्री

भेट देण्यापेक्षा समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य - प्रभू

९ जानेवारीला केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू देणार ठाण्याला भेट, मध्य रेल्वेच्या परिस्थितीचा घेणार आढावा.

- पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची मध्यस्ती

तब्बल 6 तासांच्या गोंधळानंतर अखेर मध्य रेल्वेची पहिली लोकल दिवा स्थानकावरुन निघाली. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्तीनंतर आणि पोलिसांनी संतप्त जमावाला पांगवल्यानंतर अखेर लोकल सुरु झाली.  

- प्रवासी कारणीभूत -  रेल्वे प्रशासन

प्रवासी कारणीभूतध्य रेल्वे विस्कळीत होण्याला आंदोलक प्रवासी कारणीभूत असल्याचं रेल्वे प्रशासनानं म्हटलंय.. एका मार्गावर वाहतूक ठप्प होती.. मात्र आंदोलनामुळं चारही मार्गावर रेल्वे ठप्प झाल्याचा अजब दावा जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी केलाय. 

- प्रवाशांची रिक्षाचालकांकडून लूट

मध्य रेल्वेच्या प्रवाशांची कल्याणमध्ये रिक्षाचालकांकडून लूट सुरु असल्याचा प्रकार उघडकीस आलाय.. रिक्षाचालक प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारत असल्याचं समोर आलंय..

मध्य रेल्वे प्रवाशांच्या आंदोलनाचा समाजकंटकांनी गैरफायदा घेतल्याचं समोर येतंय. दिव्याला बुकिंग ऑफिसमधली कॅश लुटल्याचं समोर आलंय.. तसंच प्रवाशांचं आंदोलन सुरु असताना समाजकंटकांनी जाळपोळ करण्याचाही प्रयत्न केलाय.. काही समाजकंटकांनी तर रेल्वे स्थानक परिसरातल्या झोपड्या जाळण्याचाही प्रयत्न केलाय.. 

- कोणत्याही प्रकारचं आंदोलन केलं नाही - मोटरमन

एकूणच या रेल्वेच्या गोधंळा बाबत मोटरमन संघटनेचे अध्यक्ष वेणू नायर यांनी प्रतीक्रिया देतांना आम्ही कोणत्याही प्रकारचं आंदोलन केलं नसल्याचं स्पष्ट करत, मोटरमनच्या सुरक्षेसाठी पोलीस देण्यात आल्यानं आम्ही दिव्यावरुन सहा तासांनंतर, पहिली गाडी सोडली असं स्पष्ट केलयं.

दुपारी १.४० वाजता
- प्रवाशांच्या आंदोलनात चोरट्यांनी हात धुवून घेतले...
- दिवा रेल्वे स्थानकावरून बुकींग काऊंटरवरील कॅश पळवली... 

दुपारी १.२५ वाजता
- डोंबिवली रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचा संतप्त उद्रेक
- तिकीट खिडकी, एटीव्हीएम मशीनची केली तोडफोड

दुपारी १.२० वाजता
- किती गाड्या रद्द झाल्या, रेल्वेचं किती नुकसान झालं, याचा आढावा घेणं सुरू 
- गृहमंत्री रणजीत पाटील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दिव्याकडे रवाना
- खासदार, आमदार रेल्वे प्रशासनाशी करणार चर्चा

दुपारी १.१५ वाजता
- मानखुर्द ते सीएसटी रेल्वे अद्यापही बंद
- टॅक्सी, रिक्षावाल्यांकडून अडकलेल्या प्रवाशांची लूट सुरूच

दुपारी १.१० वाजता
- दिवा आणि सीएसटीवरून लोकल सेवा हळूहळू सुरू मात्र सेवा पूर्वपदावर येण्यासाठी उशीर लागेल

दुपारी १२.४५ वाजता
- गोंधळ कायम, मध्य रेल्वेच्या स्टेशन्सवरील इंडिकेटर बंद
- कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून अचानक गाड्या सोडण्यात आल्यानं प्रवाशांची कुचंबनेतून सुटकेसाठी धडपड... प्रवासी गाड्या पकडण्यासाठी रेल्वे ट्रॅक ओलांडत आहेत.

दुपारी १२.४० वाजता
- आंदोलकांना रुळावरून हटवण्यात पोलिसांना यश
- तब्बल सहा तासानंतर दिव्याहून पहिली रेल्वे रवाना
- मात्र, आंदोलक अजूनही दिवा रेल्वे स्थानकातच ठाण मांडून बसलेत

दुपारी १२.३० वाजता
- मोटरमनचा संप मागे... 
- एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल 

दुपारी १२.२७ वाजता
- तणाव आणि गोंधळ वाढल्यानंतर मध्य रेल्वेच्या मार्गावरच्या अनेक स्टेशन्सवर तिकीट खिडक्या बंद

दुपारी १२.२० वाजता
- टिळक नगर स्टेशनवर संतप्त प्रवाशांनी एटीएम मशीन फोडून रेल्वे ट्रॅकवर टाकले
- पनवेल ते सीएसटी संपूर्ण वाहतूक ठप्प

दुपारी १२.०० वाजता
- गोंधळामुळे मध्य रेल्वेसोबतच हार्बर रेल्वे आणि टान्स हार्बर रेल्वेही बंद

सकाळी १२.१५ वाजता
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यात चर्चा सुरू

सकाळी ११.५५ वाजता
- मोटरमनला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मोटरमननं संप पुकारला
- लहान मुले, वृद्धांचे हाल

सकाळी ११.४५ वाजता
- मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे बंद
- प्रवाशांच्या दगडफेकीत मोटरमन आर. के. चावडे गंभीर जखमी
- पेंटाग्राफचा गोंधळ संपल्यानंतर दिव्यात संतप्त प्रवाशांनी दगडफेक केल्यामुळे प्रवासी, पोलिसांमधील तणाव वाढला
- दिव्याला काही समाजकंटकांनी रेल्वे ट्रॅक जवळील झोपडपट्टी पेटवून देण्याचाही केला प्रयत्न
- लांब पल्ल्ल्याच्या गाड्या खोळंबल्या

सकाळी ११.३५ वाजता
- घरातून बाहेर पडलेले सर्व प्रवासी ठाणे ते दिवा स्थानकावर अडकले... दोन तासांपासून स्टेशनवरच रेंगाळले प्रवासी

सकाळी १०.४६ वाजता
- रेल्वेमंत्री सुरेश प्रभू बैठकीसाठी गरवारे क्लबमध्ये दाखल... कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही
- ठाण्याच्या पुढे जाणाऱ्या सर्व गाड्या ठप्प
- कसाऱ्याहून येणाऱ्या गाड्या टिटवाळा स्थानकावर आल्यानंतर पुढे रद्द करण्यात आल्या.

सकाळी १०.३२ वाजता
- संतप्त प्रवाशांनी दिव्यामध्ये पोलिसांची गाडी जाळली... रेल्वे स्थानकाची तोडफोड केली
- प्रवाशांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला

ठाणे : कल्याण-ठाकूर्ली दरम्यान पेंटाग्राफ तुटल्याने आधीच गोंधळ उडाला असताना दिवा येथे संतप्त प्रवाशांनी रेल रोको आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी थेट लाठीचार्ज केल्याने संतप्त लोकांनी दगडफेक करत जाळपोळ केली. यावेळी एक गाडी पेटवून दिली.

मध्य रेल्वे मार्गावर वारंवार घटना घडत असल्याने प्रवासी संपप्त झालेत. दिवा स्थानकात दोन तासांपासून गाडी नसल्याने प्रवाशांचा पारा चढला आणि त्यांनी रेल्वे रोखून धरली. त्यामुळे फास्ट ट्रॅकवरील वाहतूकही खोळंबली. त्यातच रेल्वेकडून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. तसेच प्रवाशांना माहिती न दिल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्टेशवर प्रवाशांची गर्दी वाढत गेली. ऑफिसला वेळेत पोहोचायचे कसे, असा प्रश्न करत प्रवाशांनी चिंता व्यक्त केली.

मध्य रेल्वे मार्गावरील फास्ट आणि स्लो गाड्यांची ठाण्यापर्यंतची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दिव्यात प्रवाशांनी दगडफेक केल्याने प्रवाशी वर्गात भीतीचे वातावरण होते. त्याचवेळी पोलिसांची गाडीही जाळल्याचे वृत्त पसरल्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.

आज सकाळी ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा वाजल्याचे पाहायला मिळाले. अजुनही रेल्वे सेवा सुरु झालेली नाही. कल्याण, डोंबिवली, दिवा, मुंब्रा या स्थानकांमध्ये हजारो प्रवाशी अडकले आहे. याबाबत बराच वेळ रेल्वेकडून कोणतीही उद्घोषणाही केली जात नव्हती. त्यामुळेच दिवा स्थानकात रखडलेल्या प्रवाशांच्या असंतोषाचा भडका उडाला. संतप्त प्रवाशांनी ट्रॅकवर उतरून आंदोलन सुरू केले.

प्रवाशांनी आपला राग थेट लोकलवर काढला. लोकलवर दडगफेक करण्यात आल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांनी प्रवाशांवर सौम्य लाठीमार केल्याने परिस्थिती चिघळलली. आंदोलनामुळे डोंबिवली-कल्याण दरम्यान गाड्यांची लांबच लांब रांग लागली आहे.

प्रवाशांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील वाहतूक अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. त्याचवेळी ठाणे-छत्रपती शिवाजी टर्मिनसदरम्याची वाहतूक मात्र सुरू आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.