राज ठाकरेंची अजित पवारांवर पुन्हा टीका

वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत आलेले उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कराडमध्ये गांधीगिरी सुरु केलीय. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली. आता करून काय उपयोग, असा सवाल राज यांनी उपस्थित केलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 14, 2013, 02:29 PM IST

www.24taas.com, मुंबई

वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत आलेले उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कराडमध्ये गांधीगिरी सुरु केलीय. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली. आता करून काय उपयोग, असा सवाल राज यांनी उपस्थित केलाय.
सामाजिक जीवनात जे काही घडलं त्याचं प्रायश्चित घेण्यासाठी आपण येथे आलोय. जो काम करतो तो चुकतो. त्यामुळे आपल्या चुकीबद्दल प्रायश्चित घेण्याचे ठरविलेय. मला जे वाटले ते मी करण्यासाठी येथे आलोय. मला काही प्रसिद्धी मिळवायची नाही. नाहीतर मी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले असते. तसे मी केलेले नाही. आपल्या राजकीय जीवनात असं काहीतरी करावसं वाटलं म्हणून मी कराडमध्ये आलोय. मला वाटलं, म्हणून मी हे करीत आहे, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले.

राज ठाकरेंनी अजितदादांच्या गांधीगिरीची खिल्ली उडवलीय. ही अजित पवारांची नौटंकी आहे. जे चूक आहे ते आहेच. जो बूंद से गई वो हौद से नही आती! जो बुंदसे गयी वो हौद से नही आती असा टोला राज यांनी अजितदादांना लगावलाय. त्यांचे वक्तव्य पुढचे ५० वर्ष महाराष्ट्रातील जनता विसरणार नाही.
अजित पवार यांनी प्रायश्चित घेण्यापेक्षा दुष्काळग्रस्तांना पाण्याची व्यवस्था करावी असं राज यांनी सांगितलं. राज यांनी जळगाव येथील जाहीर सभेत अजित पवार यांच्या बेताल वक्तव्याचा समाचार घेतला होता. त्यानंतर आज राज यांनी टीका केली. आता प्रायश्चित घेऊन उपयोग काय, असा प्रतिहल्ला राज यांनी चढवलाय.