पैसे मिळवणे हाच सेनेचा अजेंडा – मुख्यमंत्री

पैसे मिळवणे हाच शिवसेनेचा एकमेव अजेंडा असल्याचा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. डीएनएचे एस. बालकृष्णन यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवलं.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Sep 14, 2013, 10:28 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पैसे मिळवणे हाच शिवसेनेचा एकमेव अजेंडा असल्याचा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. डीएनएचे एस. बालकृष्णन यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवलं.
मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची १५ वर्षांपासून सत्ता आहे. मात्र सत्ताधा-यांकडे व्हिजन नसल्याचं त्यांनी म्हटलंय. मुंबईतील परिस्थिती गंभीर असल्याचं मान्य करत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेकडे बोट दाखवलंय. महापालिकेचा कमी झालेला महसूल, जागोजागी पडलेले खड्डे याला सत्ताधारी शिवसेनाच जबाबदार असल्याचा आरोप केलाय.
उद्धव ठाकरे ही चांगली व्यक्ती असल्याचंही त्यांनी आवर्जून नमूद केलंय.
फाईल तत्परतेने क्लिअर होत नाहीत. डीबी रिअँलीटी या कंपनीची फाईल क्लिअर न झाल्यानं शरद पवार नाराज होते का ? या प्रश्नावरही मुख्यमंत्र्यांनी सावध उत्तर दिलंय. मी कुठल्याही वैयक्तिक प्रकरणावर टीप्पणी करणार नाही. शरद पवारांशी माझे चांगले संबंध असून राज्यातल्या दुष्काळ प्रश्नावर त्यांनी मोठी मदत केल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.
गुजरात सरकार हे विकासाचं प्रतिक नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. मोदींनी काही चांगले निर्णय घेतलेत. मात्र त्याला आपण विकासाचं मॉडेल म्हणू शकत नाही. पुढची लोकसभा निवडणूक ही राहूल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी असेल का? या प्रश्नावर त्यांनी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत असेल असं स्पष्ट केलंय. आजच्या तरुणांना हिंसक राजकारण नकोय. तर त्यांनी विकासाची आस आहे, असंही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.