पवारांना CM उमेदवार जाहीर केलं तरी फरक नाही - तावडे

शरद पवारांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार केलं तरी काहीही फरक पडणार नाही, त्यांचं आव्हान आता उरलेलं नाही, अशी प्रतिक्रिया दिलीय. विनोद तावडे यांनी. राष्ट्रवादीनं आधीच भ्रष्टाचाराला आळा घालायला हवा होता, असंही ते म्हणाले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 7, 2014, 05:52 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार केलं तरी काहीही फरक पडणार नाही, त्यांचं आव्हान आता उरलेलं नाही, अशी प्रतिक्रिया दिलीय. विनोद तावडे यांनी. राष्ट्रवादीनं आधीच भ्रष्टाचाराला आळा घालायला हवा होता, असंही ते म्हणाले.
राज्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरचा कार्यकर्त्यांचा विश्वास उडाला आहे. थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर करण्याची मागणी पुण्यातल्या कार्यकर्त्यांनी केली आहे. विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येतेय, तसतशी सत्ताधारी पक्षांमधली अस्वस्थता वाढायला लागली आहे. काँग्रेसमध्ये प्रामुख्यानं मुख्यमंत्र्यांवर रोष आहे. निवडणुका जवळ आल्या तरी पक्षात असलेला धोरणलकवा अनेकांना मान्य नाही. दोन नव्या मंत्र्यांना अद्याप खातेवाटप झालेलं नाही, विधान परिषदेची नावं निश्चित नाहीत.अशा स्थितीत कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.
तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यातल्या एकाही नेत्यावर कार्यकर्त्यांचा विश्वास उरलेला नाही, असंच दिसतंय.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीही अस्वस्थ आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हतबल झालेत आणि आता थेट शरद पवारांनाच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार करा, अशी त्यांची मागणी आहे. आता जितेंद्र आव्हाड यांनीही कार्यकर्त्यांच्या सुरात सूर मिळवलाय.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वीच यामुळं मुख्यमंत्रीपदासाठी तीन नेत्यांची नावं पुढे आलीय. यापूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपण विधानसभा निवडणूकीत उभे राहणार आणि सत्ता आल्यास मुख्यमंत्रीही होणार असं जाहीर केलंय. तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं... यावरच पुढं आता शरद पवारांचं नाव येतंय. त्यामुळं ही निवडणूकही चांगलीच रंगतदार होईल, असंच दिसतंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.