एआयटीएचं घाणेरडं राजकारण, भूपती बरसला

दोन वर्षांची बंदी घातल्यानंतर टेनिसपटू महेश भूपतीनं एआयटीएवर जोरदार हल्लाबोल केलाय. बंदीचा निर्णय हा मीडियामार्फत आपल्यापर्यंत पोहचल्याचंही यावेळी भूपतीनं म्हटलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 18, 2012, 05:52 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
दोन वर्षांची बंदी घातल्यानंतर टेनिसपटू महेश भूपतीनं एआयटीएवर जोरदार हल्लाबोल केलाय. बंदीचा निर्णय हा मीडियामार्फत आपल्यापर्यंत पोहचल्याचंही यावेळी भूपतीनं म्हटलंय.
‘एआटीए माझ्या निष्ठेवर शंका निर्माण करू शकत नाही, देशद्रोही म्हणून हिणवून घेणं मी अजिबात सहन करणार नाही, एआयटीएनं घेतलेला बंदीचा निर्णय मला अमान्य आहे आणि या निर्णयाविरोधात मी कायदेशीर मार्गांचा नक्कीच विचार करणार आहे’ अशा शब्दांत भूपतीनं आपली नाराजी व्यक्त केलीय. भारतीय टेनिस ‘संघ ‘फोडा आणि राज्य करा’ नीतीचा अवलंब करत आहे... आयटीएचा हे धोरण धोकादायक ठरू शकतं’ असा आरोपही यावेळी भूपतीनं केलाय. यावेळी त्याचा रोख होता एआयटीएचे अध्यक्ष अनिल खन्ना यांच्यावर... खन्ना घाणेरडं राजकारण करून खेळाडूंमध्ये मतभेद निर्माण करत असल्याचं भूपतीनं म्हटलंय. एआयटीएनं मला टार्गेट करण्यासाठी पेसचा वापर केला असल्याचा गंभीर आरोपही यावेळी भूपतीनं केलाय.
लिएंडर पेसबरोबर खेळण्यास नकार देणाऱ्या महेश भूपती आणि रोहन बोपन्ना या भारतीय टेनिस जोडीवर दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय ‘ऑल इंडिया टेनिस असोसिएशन’नं घेतला होता. जोपर्यंत भारत डेव्हिस कपच्या एशिया ओशियाना ग्रुपमध्ये दाखल होत नाहीत, तोपर्यंत या दोघांना टीममध्ये संधी देण्यात येणार नाही. युवा टेनिसपटूंनी अविस्मरणीय कामगिरी केल्यानंच एआयटीएनं हा निर्णय घेतला होता. त्यामुळे महेश भूपती आणि एआयटीए यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.