नक्षलवादाच्या छायेत गडचिरोलीत निवडणूक

नक्षलवादानं ग्रासलेल्या गडचिरोली जिल्ह्यात कोणतीही निवडणूक प्रशासनासाठी आव्हान ठरते. हे दिव्य पार पाडण्यासाठी प्रशासनानं कंबर कसली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Updated: Feb 11, 2012, 04:35 PM IST

आशिष अम्बाडे, www.24taas.com, गडचिरोली

 

नक्षलवादानं ग्रासलेल्या गडचिरोली जिल्ह्यात कोणतीही निवडणूक प्रशासनासाठी आव्हान ठरते. त्यातही जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक म्हणजे दिव्यच आसतं. हे दिव्य पार पाडण्यासाठी प्रशासनानं कंबर कसली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 

राज्यातल्या कोणत्याही भागापेक्षा गडचिरोली जिल्ह्यातली उमेदवारी म्हणजे सुळावरची पोळीच ठरते. लोकशाही प्रक्रियेला नक्षलवाद्यांचा कायम विरोध राहिला आहे. त्यामुळे यंदा सुरक्षेच्या कारणास्तव २ टप्प्यात निवडणूक घेण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनानं मतदान केंद्रावर सुरक्षेसाठी कडक उपाययोजना केली आहे. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी खाजगी वाहनांसह हेलिकॉप्टर्सची व्यवस्थाही करण्यात आली आहे. मतदानाची वेळ सकाळी ७ ते दुपारी ३ अशी ठेवण्यात आली असून जिल्हा प्रशासनाच्या मदतीला केंद्रीय राखीव पोलीस तसच राज्य राखीव दलाची तुकडी तैनात असणार आहे.

 

जिल्ह्यात पहिल्या टप्प्याच्या मध्यात भामरागडच्या तालुका काँग्रेस अध्यक्षांची हत्या करून नक्षलवाद्यांनी सुरक्षा यंत्रणेची झोप उडवली आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात मतदान सुरळीत पार पाडण्याचं खडतर आव्हान प्रशासनासमोर आहे.