कोकणातील जमिनी विकल्यास पस्तावाल – राज ठाकरे

कोकणची प्रगती हवी असेल तर परप्रांतीयांना जमिनी विकण्याऐवजी आपल्याच हातात ठेवल्या तरच कोकणचा विकास होईल. यासाठी सर्वांनी पक्षांची लेबले न लावता कोकणच्या विकासाचा विचार केला पाहिजे, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी व्यक्त केले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 6, 2013, 10:46 AM IST

www.24taas.com, मुंबई
कोकणची प्रगती हवी असेल तर परप्रांतीयांना जमिनी विकण्याऐवजी आपल्याच हातात ठेवल्या तरच कोकणचा विकास होईल. यासाठी सर्वांनी पक्षांची लेबले न लावता कोकणच्या विकासाचा विचार केला पाहिजे, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी व्यक्त केले.
गोरेगाव येथील ग्लोबल कोकण महोत्सवात ते बोलत होते. कोकणच्या विकासाबरोबरच त्यांनी पुन्हा एकदा परप्रांतीयांचा मुद्दा उपस्थित करून नव्या वर्षात वादाला सुरुवात केली. कोकणातील हजारो एकर जमिनी परप्रातियांच्या ताब्यात गेल्याचेही त्यांनी सांगितले. कोकणातील जमिनी परप्रांतीयांना विकण्याच्या थांबवल्या तर कोकणचा विकास होईल. बलस्थानं गमावून बसलो तर विकास कसा होईल, असा सवालही त्यांनी केला.

मुंबईत उत्तरप्रदेश विद्यापीठ, युपी भवन याची मागणी केली जाते आणि मग मी बोललो की लगेच काय तर प्रांतीय का?’’अशाच जमिनी कृपाशंकर सिंग यांने कोकणात घेऊन ठेवल्या आहेत, कोकणात दिसली जमीन की, घेतली सिंगाने, अशी खिल्ली राज यांनी उडवून गंभीरतेवर बोट ठेवलं.
या वेळी ते म्हणाले, कोकणचा विकास सर्वांना पाहिजे, परंतु तेथे पायाभूत सुविधा नाहीत. अशा सुविधा एखादी संस्था देणार नसून राज्य सरकारने याचा विचार करायला हवा. आपण कोकणाची जी प्रगती इच्छितो ती मराठी माणसाच्या हातात राहणार का, हा खरा प्रश्न असल्याचे राज म्हणाले.
दिल्ली गँगरेप प्रकरणातील आरोपी हे बिहारीच, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतियांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. राज ठाकरेंनी पुन्हा परप्रातियांचा मुद्दा घेऊन बिहारींवर निशाणा साधला. राज ठाकरे बोलला की, केसेस टाकायच्या अटक करायचे, पण बलात्कार करणारे होते कोण बिहारीच ना?, असा सवाल राज यांनी उपस्थित केला.
दिल्ली गँगरेप प्रकरणातील आरोपी बिहारीच असल्याचे उघडकीस आले. परंतु ती बाब सोयीस्करपणे विसरली गेली आणि फक्त बलात्काराचीच चर्चा झाली, असे सांगून राज यांनी परप्रांतीयांवर पुन्हा एकदा तोफ डागली. मी द्वेष पसरवत नाही; परंतु मुंबई, दिल्लीच नव्हे तर अनेक राज्यांत बिहारी परप्रांतीयांची गुन्हेगारी वाढली आहे. शीला दीक्षित यांनी परप्रांतीयांवर वक्तव्य केले होते. मात्र, त्यांना कोणीही बोलत नाही असेही ते म्हणाले.