हर्षवर्धन पाटील यांच्या कारखान्याला शेतकऱ्यांचा विरोध

सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या सोलापुरातल्या साखर कारखान्याला, मोहोळ तालुक्यातल्या 20 गावातल्या शेतक-यांनी विरोध केलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 14, 2013, 10:08 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सोलापूर
सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या सोलापुरातल्या साखर कारखान्याला, मोहोळ तालुक्यातल्या 20 गावातल्या शेतक-यांनी विरोध केलाय. या कारखान्यामुळे पाण्याचा एकमेव स्त्रोत असलेला आष्टी तलाव प्रदूषित होईल, अशी भीती गावक-यांना वाटू लागलीय आहे. त्यामुळे या कारखान्याला विरोध करण्यासाठी गावकरी रस्त्यावर उतरले आहेत.
इंदापुरातल्या दोन साखर कारखान्यानंतर, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोलापुरातल्या मोहोळमध्ये औदुंबर अण्णा पाटील साखर कारखान्याची उभारणी सुरू केली आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या पत्नी या कारखान्याच्या चेअरमन आहेत. मोहोळच्या आष्टी तलावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या या कारखान्याला गावक-यांचा प्रचंड विरोध आहे. आष्टी तलाव हा मोहोळ तालुक्यासाठी एकमेव पाण्याचा स्त्रोत आहे. या कारखान्याच्या केमिकलमुळे आष्टी तलाव दूषित होईल अशी भीती गावक-यांना वाटू लागलीये. परिसरातल्या 20 गावातल्या शेतक-यांनी मोर्चा काढून या कारखान्यावर कारवाईची मागणी केली आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं सहकारमंत्र्यांच्या दबावाखाली परवानगी दिल्याचा गावक-यांचा आरोप आहे. तर जिल्हाधिका-यांनी कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई करणार असल्याचं आश्वासन दिलंय. एकूणच गावक-यांच्या प्रचंड विरोधामुळे हा कारखाना आता वादाच्या भोव-यात सापडलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.