'मीच रोहित शर्माला कर्णधार केलं अन् आता...', सौरव गांगुलीने व्यक्त केली खंत, 'आता जेव्हा...'

विराट कोहलीने (Virat Kohli) भारतीय क्रिकेट संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्माकडे (Rohit Sharma) नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. विराट कोहलीने कर्णधारपद सोडताना तत्कालीन बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीवर (Sourav Ganguly) गंभीर आरोप केले होते.   

शिवराज यादव | Updated: Jul 14, 2024, 03:20 PM IST
'मीच रोहित शर्माला कर्णधार केलं अन् आता...', सौरव गांगुलीने व्यक्त केली खंत, 'आता जेव्हा...' title=

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारतीय संघाने टी-20 वर्ल्डकप जिंकला असून आयसीसी ट्रॉफी न जिंकण्याचा दुष्काळ संपवला आहे. भारताने टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला आणि तब्बल 11 वर्षांनी आयसीसी ट्रॉफी जिंकली. याआधी भारताने महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. विराट कोहली (Virat Kohli) मात्र आपल्या नेतृत्वात एकही आयसीसी ट्रॉफी जिंकू शकला नव्हता. पण रोहितने भारताला अखेर ते यश मिळवून दिलं आहे. 

पण विराट कोहलीला कर्णधारपदावरुन हटवल्यानंतर रोहित शर्माकडे नेतृत्व सोपवण्यात आलं तेव्हा सर्व काही आलबेल नव्हतं. विराट कोहलीने आपल्याला काही कल्पना न देता कर्णधार पदावरुन हटवलं होतं असा आरोप केला होता. त्याच्या आरोपांमुळे तत्कालीन बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीविरोधात (Sourav Ganguly) नाराजीचा सूर होता. 

भारताने टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर संपूर्ण भारत त्याचं कौतुक आणि सेलिब्रेशन करत असताना सौरव गांगुलीने मात्र जुन्या दिवसांची आठवण करुन दिली आहे. रोहित शर्माकडे नेतृत्व देण्याचा निर्णय माझा होता असा खुलासा सौरव गांगुलीने केला आहे. 

"रोहित शर्माकडे नेतृत्व देण्यात आलं होतं, तेव्हा माझ्यावर टीका करण्यात आली होती. पण आता जेव्हा त्याच्या कर्णधारपदात आपण जिंकलो आहोत तेव्हा मला कोणीही शिवीगाळ करत नाही आहे. मीच त्याला कर्णधार केलं हे सगळेजणं विसरले आहेत," अशी खंत सौरव गांगुलीने व्यक्त केली आहे.

विराट कोहलीने स्वत:हून टी-20 संघाचं कर्णधारपद सोडलं होतं. मात्र त्याला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन हटवण्यात आलं होतं. यानंतर त्याने कसोटी संघाचं नेतृत्वही सोडण्याचं ठरवलं. यानंतर बीसीसीआयने रोहित शर्मा तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधारपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला होता. 

ज्याप्रकारे कर्णधारपदात बदल झाला होता, ते पाहता सौरव गांगुलीवर टीका करण्यात आली होती. क्रिकेटचाहते आणि माजी खेळाडूंनी सौरव गांगुलीवर जाहीरपणे टीका केली होती. रोहितला कर्णधार केल्याने सोशल मीडियावर गैरवर्तन, ट्रोलिंग आणि प्रश्नांना सामोरं जावे लागलेल्या गांगुलीने आता भारताच्या T20 विश्वचषक विजयाचा आनंद साजरा करणाऱ्यांना आठवण करुन देण्याचा पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. 

भारताने T20 विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित आणि विराट दोघांनीही टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पण रोहित शर्मा आणि विराट कोहली एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट खेळत राहणार आहेत.