हार्दिक-क्रृणाल आणि त्यांचे वडील हिमांशू पांड्या यांच्यावर दंगल एवढाच रंजक सिनेमा होईल..हे किस्से बहारदार आहेत

एक काळ असा होता की, पांड्या ब्रदर्सकडे रणजी करंडक सामना खेळण्यासाठी दोन स्वतंत्र बॅटी नव्हत्या. पण त्यानंतर त्यांच्या खेळाने त्यांना ओळख मिळवून दिली. 

Updated: Apr 19, 2021, 06:33 PM IST
हार्दिक-क्रृणाल आणि त्यांचे वडील हिमांशू पांड्या यांच्यावर दंगल एवढाच रंजक सिनेमा होईल..हे किस्से बहारदार आहेत title=

मुंबई : एक काळ असा होता की, पांड्या ब्रदर्सकडे रणजी करंडक सामना खेळण्यासाठी दोन स्वतंत्र बॅटी नव्हत्या. पण त्यानंतर त्यांच्या खेळाने त्यांना ओळख मिळवून दिली. आता हार्दिक आणि क्रृणाल पांड्या आयपीएल आणि भारतीय संघाच्या प्रवासात पोहोचले आहेत. इंग्लंडविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यात क्रृणाल पांड्याने आपला डेब्यू केला आहे. परंतु त्यांचे वडील हिमांशु पांड्या हा खास क्षण पाहण्यासाठी या जगात नाहीत.

क्रृणाल आणि हार्दिकच्या या प्रवासात त्यांचे वडील हिमांशु पांड्या यांचे खूप योगदान आहे. क्रृणाल आणि हार्दिक हे बर्‍याचदा या गोष्टींबद्दल बोलत असतात. आपल्या पहिल्या एकदिवसीय सीरीझमध्ये विशेष कामगिरी केल्या नंतर क्रृणाल आपल्या वडिलांविषयी ही बरेच बोलला.

आपण हिमांशु पांड्या आणि पांड्या ब्रदर्स यांच्यातील काही रंजक किस्से जाणून घेऊयात.

हार्दिक आणि क्रृणालचे वडील हिमांशु पांड्या यांनी त्यांच्या स्वप्नांचे ओझे कधीच मुलांवर टाकले नाही. एका मुलाखतीत दोन्ही भावांनी हा किस्सा शेअर केला. हिमांशु पांड्या आपल्या मुलांना इतका सपोर्ट करायचे की, जेव्हा अभ्यास केला नाही म्हणून शिक्षक शाळेतून तक्रार करायचे, तेव्हा ते भांडण करण्यासाठी शाळेत पोहचायचे.

शिक्षक जेव्हा हिमांशु पांड्याकडे तक्रार करायचे आणि सांगायचे की, "हे दोघे काहीही अभ्यास करत नाहीत, त्यांना काही तरी शिकवा." तेव्हा हिमांशु पांड्या त्यांना सांगायचे की, ''तुम्हाला तर माहित आहे की, माझी मुलं काय बनणार आहेत ते?''

हिमांशु पांड्यांना आपल्या दोन्ही मुलांवर खूप विश्वास होता. जेव्हा क्रृणाल अवघ्या साडे नऊ ते दहा वर्षांचा होता तेव्हा त्याचे वडील त्याला महाविद्यालयातील मोठ्या मुलांबरोबर क्रिकेट खेळण्यासाठी घेऊन जायचे. यासाठी हे दोघेही घरातून 50 किलोमीटर अंतरावर जात असत. हिमांशु पांड्या दुचाकीच्या डिक्कीत क्रिकेटची बॅट अडकवून किटची बॅग पुढे ठेवून क्रृणालला घेऊन महाविद्यालया जायचे आणि त्या मुलांना सांगायचे की, "जो याला आऊट केरेल, त्याला मी100 रुपये देईन."

पण त्या साडे नऊ ते दहा वर्षांच्या मुलाला आऊट करायला महाविद्यालातील मुलांना घाम फुटायचा. त्या मुलांविरूद्ध क्रृणाल सुमारे दीड तास फलंदाजी करायचा. त्या मुलांपैकी कोणीतरी खूप मेहनतीने त्याला आऊट करु शकायचे.

मुलासाठी बडोद्याला शिफ्ट

जेव्हा क्रृणाल अवघ्या सहा वर्षांचा होता तेव्हा तो त्याच्या वडिलांसोबत सुरतमध्ये क्रिकेट खेळायचा. मग हिमांशु पंड्याला असे वाटले की, त्याच्या खेळात काहीतरी वेगळेपणा आहे. त्यावेळी हिमांशु क्रृणालला रानदेड जिमखान्यात सराव करण्यासाठी घेऊन जायचे. एक दिवस तेथे एक विशेष सामना होता. तो सामना पाहण्यासाठी किरण मोरेचे व्यवस्थापक श्री. ब्रार आले होते. त्यांनी क्रृणालला फलंदाजी करताना पाहिले आणि हिमांशु पांड्याना म्हणाले, "तूम्ही याला बडोद्याला घेऊन या, त्याचे फ्यूचर चांगले आहे."

पण केवळ सहा वर्षांच्या मुलासाठी हिमांशुला सुरतमधील आपला व्यवसाय सोडून देणे सोपे नव्हते. पण हिमांशुने हे केले. ते 15-20 दिवसातच बडोद्याला आपल्या कुटुंबासोबत शिफ्ट झाले.

गर्दीतून मुलांना आवाज द्यायचे

जेव्हा क्रृणाल आणि हार्दिकचे दिवस बदलले आणि ते स्टार क्रिकेटर बनले, तेव्हा त्यांच्या वडिलांना मुलांच्या या यशाचा अभिमान वाटला. जिवंत असताना दरवर्षी हिमांशु पांड्या कमीत कमी दोन ते तीन आयपीएल सामने पाहायला स्टेडीयमवर जात असत.

तेव्हा मुंबईची टीम ट्रायडंट हॉटेलमध्ये राहायची. त्यावेळेस बाहेर बरीच गर्दी असायची. विशेषता सव्वा सहाच्या वेळी संघ हॅाटेल बाहेर पडत असत, त्यावेळी तिथे खूप गर्दी असायची. त्यावेळेस हिमांशु त्या गर्दीत उभे राहून आपल्या मुलांना गर्दीतून आवाज द्यायचे, ‘हे कृणाल.. कृणाल… हार्दिक…. हार्दिक.’ आणि मग जेव्हा क्रृणाल किंवा हार्दिक त्यांना भेटायला जायचे, तेव्हा ते लोकांना सांगायचे की, ही माझी मुलं आहेत.