एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारत की पाकिस्तान बेस्ट? वर्ल्ड कपआधी पाहा दोन्ही संघांचा रेकॉर्ड

India vs Pakistan Records: भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. 8 ऑक्टोबरला भऱताचा पहिला सामना रंगणार असून बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान सामना 14 ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. 

राजीव कासले | Updated: Sep 30, 2023, 09:44 PM IST
एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारत की पाकिस्तान बेस्ट? वर्ल्ड कपआधी पाहा दोन्ही संघांचा रेकॉर्ड title=

India vs Pakistan ODI Records: क्रिकेटचा कुंभमेळा अर्थात आयसीसी एकदविसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला (ICC World Cup 2023) आता अवघ्या चार दिवसांचा अवधी उरला आहे. या स्पर्धेत सर्वांच लक्ष लागलं आहे ते पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यावर. 14 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) हा सामना खेळवला जाणार आहे. पाकिस्तानचा संघ सध्या हैदराबादमध्ये आहे. भारताविरुद्धच्या सामन्याआधई पाकिस्तान नेदरलँड आणि श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. पाकिस्तान 6 ऑक्टोबरला नेदरलँड तर 10 ऑक्टोबरला श्रीलंकेबरोबर दोन हात करेल. 

एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारत-पाकची कामगिरी
भारत आणि पाकिस्तान संघ केवळ आयसीसी स्पर्धेतच खेळतात. गेल्या सात वर्षात या दोन संघांमध्ये एकही क्रिकेट मालिका झालेली नाही. भारत आणि पाकिस्तान संघाची एकदिवसीय क्रिकेटमधली कामगिरी पाहिली तर हे दोन संघांमध्ये आतापर्यंत 134  सामने झालेत. यातल्या 56 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवलाय. तर 73 सामन्यात पाकिस्तानने बाजी मारली आहे. एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासात पाकिस्तानची बाजू वरचढ असली तर गेल्या 10 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने पाकिस्तानला तब्बल सात सामन्यात पराभूत केलं आहे. तर केवळ दोन सामन्यात पाकिस्तानला विजय मिळवता आला आहे. एक सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. 

6 वर्षापासून भारत विजयी
गेल्या सहा वर्षात भारतीय क्रिकेट संघ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तानविरुद्ध हरलेला नाही.  पाकिस्तानने 2017 मध्ये शेवटचं भारताला हरवंल होतं. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पाकिस्तानने भारतावर 180 धावांनी विजय मिळवला होता. 

विश्वचषक स्पर्धेत भारत-पाक
विश्वचषक स्पर्धेचा इतिहास पाहिला तर भारतीय संघाचं पारडं जड ठरलं आहे. पाकिस्तानला एकदाही भारतावर मात करता आलेली नाही.  विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान आतापर्यंत सातवेळा आमने सामने आलेत, आणि हे सामही सामने भारताने जिंकलेत. 1992, 1996, 1999, 2003, 2011, 2015 आणि 2019 विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानला धुळ चारली आहे. 

2019 च्या विश्वचषक स्पर्धेत भारताने एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा 89 पराभवकेला होता. भारताने पाच विकेट गमावत 336 धावा केल्या होत्या. तर पाकिस्तानचा संघ 212 धावांवर ऑलआऊट झाला होता. 

12 वर्षांनंतर भारत रचणार इतिहास
यंदाची विश्वचषक स्पर्धा भारतात होतेय आणि टीम इंडिया जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानली जातेय. याआधी 2011 मध्ये भारतात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताने अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव करत दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं होतं. आता पुन्हा एकदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया विश्वचषक पटकावण्यासाठी सज्ज झालीय.