India vs Malaysia : ‘लेडी सेहवाग’च्या 9 चेंडूत 46 धावा! मलेशियाला धु-धु धुतलं

India vs Malaysia Asian Games 2023 : भारत आणि मलेशिया यांच्यात आशियाई क्रीडा 2023 महिला टी 20 मधील पहिला उपांत्यपूर्व सामना खेळवला जात आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारताने शफाली वर्माच्या (67) झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर 173 धावा केल्या.

Updated: Sep 21, 2023, 11:07 AM IST
India vs Malaysia : ‘लेडी सेहवाग’च्या 9 चेंडूत 46 धावा! मलेशियाला धु-धु धुतलं title=

India Women vs Malaysia Women Quarter Final : आशियाई क्रीडा 2023 मधील महिला क्रिकेटचा पहिला उपांत्यपूर्व सामना भारत आणि मलेशिया (IND W vs MLY W) यांच्यात खेळवला जात आहे. हांगझू येथील पिंगफेंग कॅम्पस क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. मलेशियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 2 गडी गमावून 173 धावा केल्या. भारताकडून शफाली वर्माने 67 ( Shafali Verma), जेमिमाह रॉड्रिग्जने 47, स्मृती मानधनाने 27 आणि ऋचा घोषने 21 धावा केल्या आहेत. या सामन्यात शफाली वर्माने ऐतिहासिक कामगिरी करत 67 धावा केल्या आहेत.

याआधी दोनदा आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेट खेळले गेले होते. मात्र भारतीय संघ त्यात सहभागी झाला नव्हता. यापूर्वी बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. दोन सामन्यांच्या बंदीमुळे हरमनप्रीत कौर आशियाई क्रीडा स्पर्धेच्या या सामन्यात खेळत नाहीये. त्यामुळे स्मृती मानधना संघाची कर्णधार आहे. कर्णधार स्मृती मानधनाला मोठी खेळी करता आली नसली तरी शफाली वर्माने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जेमिमा रॉड्रीग्जच्या मदतीने शफालीने भारताला मोठे लक्ष्य उभारून दिले. 

या सामन्यात कर्णधार मानधना आणि शफाली वर्मानी भारताला आक्रमक सुरूवात करून दिली. 5.2 षटकांत दोघींनी 57 
धावा काढल्या. त्यानंतर मानधना 27 धावांवर झेलबाद झाली. त्यानंतर शफाली आणि जेमिमा रॉड्रीग्ज यांची जोडी मैदानावर होती. मात्र दोनच चेंडूनंतर पावसामुळे सामना थांबवण्यात आला. पावसामुळे वेळ वाया गेल्याने 15 षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय झाला. त्यानंतर शफाली वर्मा आणि जेमिमा रॉड्रीग्ज पुन्हा मैदानात उतरल्या आणि त्यांनी तुफान फटकेबाजी केली. या सामन्याची महत्त्वाची बाब म्हणजे शफालीने अवघ्या नऊ चेंडूत 46 धावा कुटल्या आहेत. 

39 चेंडूंत 4 चौकार  आणि पाच षटकारांच्या मदतीने शफालीने 67 धावांची खेळी केली. 13व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मास अलिसाने शेफाली वर्माला एलबीडब्ल्यू आऊट करून भारताला दुसरा धक्का दिला. शेफाली वर्मा बाद झाल्यानंतर, ऋचा घोष मैदानात आली. त्यावेळी भारताची धावसंख्या 150 च्या पुढे गेली होती.15 षटकांच्या अखेरीस भारताने 2 गडी गमावून 173 धावा केल्या. जेमिमा 47 धावांवर नाबाद राहिली, तर ऋचा घोषने 7 चेंडूत 21 धावांची तुफानी खेळी केली.