IPL 2019: प्लेऑफच्या शेवटच्या २ स्थानांसाठी ५ टीममध्ये टक्कर

आयपीएलचा १२वा मोसम आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे

Updated: Apr 29, 2019, 10:49 PM IST
IPL 2019: प्लेऑफच्या शेवटच्या २ स्थानांसाठी ५ टीममध्ये टक्कर title=

मुंबई : आयपीएलचा १२वा मोसम आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे, पण अजूनही प्ले ऑफमध्ये कोणत्या टीम प्रवेश करणार याबाबत उत्सुकता कायम आहे. सध्याच्या पॉईंट्स टेबलवर नजर टाकली तर २००८ पासून यंदाच्या मोसमात सर्वाधिक चुरस पाहायला मिळत आहे. प्लेऑफच्या शेवटच्या २ स्थानांसाठी ५ टीममध्ये टक्कर पाहायला मिळत आहे. यामध्ये मुंबई, हैदराबाद, कोलकाता, पंजाब आणि राजस्थान या टीमचा समावेश आहे. बंगळुरूची टीम प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे.

दिल्ली आणि चेन्नईच्या टीम प्लेऑफमध्ये आधीच पोहोचल्या आहेत. या दोन्ही टीमनी १२ पैकी ८ मॅच जिंकल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही टीमकडे प्रत्येकी १६-१६ पॉईंट्स आहेत. चांगल्या नेट रनरेटमुळे दिल्लीची टीम पहिल्या क्रमांकावर आहे. तर मुंबईची टीम तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईने १२ पैकी ७ मॅच जिंकून १४ पॉईंट्स कमावले आहेत. उरलेल्या २ पैकी एक मॅच जिंकली तरी मुंबईची टीम प्लेऑफमध्ये प्रवेश करेल, पण दोन्ही मॅचमध्ये मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला, तर इतर टीमची कामगिरी आणि मुंबईचा नेट रनरेट यावर प्लेऑफचं भवितव्य अवलंबून असेल.

राजस्थानची टीम पॉईंट्स टेबलमध्ये संघर्ष करत आहे. प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी राजस्थानला उरलेल्या दोन्ही मॅच जिंकाव्या लागणार आहेत. या दोन्ही मॅच जिंकल्या तरी प्लेऑफचं गणीत नेट रनरेटवर अवलंबून असेल. राजस्थानची पुढची मॅच मंगळवारी बंगळुरूविरुद्ध होणार आहे. १२ मॅचमध्ये ५ विजय आणि ७ पराभवामुळे राजस्थानच्या खात्यात १० पॉईंट्स आहेत.

पॉईंट्स टेबलकडे बघितलं तर हैदराबाद आणि पंजाबच्या टीमला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची जास्त संधी आहे. या दोन्ही टीममधली जी टीम सोमवारची मॅच जिंकेल, त्यांचा प्लेऑफचा प्रवेश आणखी जवळ होईल. या दोनपैकी जी टीम जिंकेल त्यांचे १२ मॅचमध्ये १२ पॉईंट्स होतील. पण ज्या टीमचा पराभव होईल त्यांची प्लेऑफमध्ये खेळण्याची आशाही कायम राहिल.