IPL 2019: आयपीएल फायनल जिंकण्यासाठी चेन्नईला १५० रनचं आव्हान

आयपीएलच्या फायनलमध्ये मुंबईने चेन्नईला विजयासाठी १५० रनचं आव्हान दिलं आहे.

Updated: May 12, 2019, 09:49 PM IST
IPL 2019: आयपीएल फायनल जिंकण्यासाठी चेन्नईला १५० रनचं आव्हान  title=

हैदराबाद : आयपीएलच्या फायनलमध्ये मुंबईने चेन्नईला विजयासाठी १५० रनचं आव्हान दिलं आहे. टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या मुंबईने २० ओव्हरमध्ये १४९/८ एवढा स्कोअर केला. कायरन पोलार्डने २५ बॉलमध्ये सर्वाधिक ४१ रन केले, यामध्ये ३ फोर आणि ३ सिक्सचा समावेश होता. चेन्नईच्या टीमने शेवटच्या १२ बॉलमध्ये फक्त १३ रन दिले.

टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या मुंबईची सुरुवात चांगली झाली. ४.५ ओव्हरमध्ये मुंबईने ४५ रन केले. पण यानंतर मुंबईला लागोपाठ २ धक्के बसले. क्विंटन डिकॉक आणि कर्णधार रोहित शर्मा लगेचच आऊट झाले. सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. कृणाल पांड्याही स्वस्तात बाद झाला. या मोसमात जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या हार्दिक पांड्याने १० बॉलमध्ये १६ रन केले.

चेन्नईकडून दीपक चहरने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या, तर शार्दुल ठाकूर आणि इम्रान ताहिरला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या.

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा 

रोहित-धोनीला इतिहास घडवण्याची संधी

आत्तापर्यंत सर्वाधिक आयपीएल जिंकण्याचा रेकॉर्ड मुंबई आणि चेन्नईच्या नावावर आहे. या दोन्ही टीमनी प्रत्येकी तीन-तीनवेळा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. मुंबईने २०१३, २०१५ आणि २०१७ साली आयपीएलमध्ये विजय मिळवला. तर चेन्नईने २०१०, २०११ आणि २०१८ साली आयपीएल जिंकली आहे. यानंतर कोलकाता, हैदराबादने २ वेळा आणि राजस्थानने एकवेळा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे.

आजच्या फायनलमध्ये विजय झाला तर सर्वाधिक ४ वेळा आयपीएल जिंकण्याचा इतिहास रोहित किंवा धोनीच्या नावावर होईल.