IPL 2023: नवीन उल-हकने पुन्हा एकदा विराटला डिवचलं? Instagram ला शेअर केला फोटो; गंभीर म्हणाला "अजिबात..."

IPL 2023: विराट कोहली (Virat Kohli) आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यातील वाद अद्याप शमलेला नाही. त्यातच आता या वादाला कारणीभूत ठरलेला नवीन उल हक (Naveen Ul Haq) याने इन्स्टाग्रामला (Instagram) एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे वादात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.   

शिवराज यादव | Updated: May 7, 2023, 02:08 PM IST
IPL 2023: नवीन उल-हकने पुन्हा एकदा विराटला डिवचलं? Instagram ला शेअर केला फोटो; गंभीर म्हणाला "अजिबात..." title=

IPL 2023: आयपीएलमध्ये (IPL) एकीकडे रंगतदार सामने होत असताना दुसरीकडे खेळाडूंमध्ये होणारे वादही चर्चेचा विषय ठरत आहेत. लखनऊ सुपजायंट्स (Lucknow Super Giants) आणि रॉयल चॅलेंर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) यांच्यातील सामन्यादरम्यान गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यात झालेला वाद अद्यापही शमलेला नाही. त्यातच आता या वादासाठी कारणीभूत ठरलेला लखनऊचा खेळाडू नवीन उल-हक (Naveen Ul-Haq) याने इन्स्टाग्रामला एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्याने अप्रत्यक्षपणे विराट कोहलीसोबत झालेल्या वादावर भाष्य केलं आहे. नवीन उल-हकच्या या पोस्टमुळे वादात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. 

विराट कोहलीसोबत वाद झाला तेव्हा त्यात नवीनचाही सहभाग होता. दोन्ही खेळाडूंमध्ये मैदानात शाब्दित वाद झाला होता. सामना संपल्यानंतरही नवीनने विराटचा हात झटकला होता. नंतर या वादात गौतम गंभीरने उडी घेतली होती. दरम्यान, नवीन याने इन्स्टाग्रामला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याच्यासह गौतम गंभीरदेखील दिसत आहे. 

सामना संपल्यानंतर लखनऊचा अष्टपैलू खेळाडू कायल मेयर्स याने कोहलीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. पण गौतम गंभीर त्याला खेचून बाजूला घेऊन गेला होता. यानंतर गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला होता. याप्रकरणी बीसीसीआयने कारवाई केली असून गौतम गंभीर आणि विराटचं 100 टक्के मानधन रद्द केलं आहे. तर नवीनचं 50 टक्के मानधन रद्द करण्यात आलं आहे. 

पण हा वाद शांत होत असतानाच नवीनने इन्स्टाग्रामला पोस्ट शेअर करत त्याला हवा दिली आहे. "लोकांना जसं तुम्हाला वागवायचं आहे, तशीच वागणूक द्या. ज्याप्रकारे तुमची लोकांशी बोलायची इच्छा असेल, तसंच बोला," अशी कॅप्शन नवीनने शेअर केली आहे. त्याने याच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे विराट कोहलीसोबत झालेल्या वादावर भाष्य केल्याचं बोललं जात आहे. 

दरम्यान त्याच्या या पोस्टवर गौतम गंभीरनेही प्रतिक्रिया दिली आहे. "जसे आपण आहोत तसेच राहा, कधीच बदलू नका," अशी कमेंट त्याने केली आहे. 

मैदानात झालेल्या वादानंतर विराट कोहलीनेही इन्स्टाग्रामला एक स्टोरी शेअर केली होती. रोमन सम्राट राहिलेले मार्कस ऑरेलियस यांचं एक प्रसिद्ध वाक्य शेअर करत विराटने लिहिलं होतं की "आपण जे काही ऐकतो ते एक मत आहे, तथ्य नाही. आपण जे काही पाहतो तो दृष्टीकोन आहे, सत्य नाही".