'मोदी सरकार नकारात्मक', शाहिद आफ्रिदीची टीका

शोएब अख्तरच्या प्रस्तावानंतर आता शाहिद आफ्रिदी म्हणतो...

Updated: Apr 13, 2020, 06:27 PM IST
'मोदी सरकार नकारात्मक', शाहिद आफ्रिदीची टीका title=

मुंबई : कोरोना व्हायरसाचा सामना करताना निधी गोळा करण्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात वनडे सीरिज खेळवा, असा प्रस्ताव पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने ठेवला होता. शोएबच्या या प्रस्तावावर कपिल देव यांनी टीका केली होती. भारत-पाकिस्तान सीरिज खेळवण्याची ही योग्य वेळ नाही, असं कपिल देव म्हणाले होते. आता शाहिद आफ्रिदी शोएब अख्तरच्या मदतीला धावून आला आहे. शोएब अख्तरचं समर्थन करताना आफ्रिदीने मोदी सरकारवर टीका केली आहे.

भारतातलं मोदी  सरकार नकारात्मक असल्याचं शाहिद आफ्रिदी म्हणाला आहे. 'पाकिस्तानला नेहमीच भारताबरोबर क्रिकेट खेळायचं आहे. मोदी सरकारच्या नकारात्मकतेमुळे भारत पाकिस्तान सीरिज होत नाही. पाकिस्तान सकारात्मक भूमिका घेऊन पुढे जात आहे. भारतही भविष्यात सकारात्मक भूमिका घेईल, अशी अपेक्षा आहे,' असं शाहिद आफ्रिदी म्हणाला.

'भारत आणि पाकिस्तानमधले संबंध चांगले झाले पाहिजेत. क्रिकेटमुळे दोन्ही देश एकमेकांजवळ येतात. मी शोएब अख्तरच्या मताशी सहमत आहे. भारत-पाकिस्तानमध्ये मॅच झाल्या पाहिजेत. दोन्ही देशांमध्ये क्रिकेट खेळवणं मोठं आव्हान आहे, कारण भारताला खेळायचं का नाही तेच माहिती नाही,' अशी प्रतिक्रिया शाहिद आफ्रिदीने दिली.