'मी चुकलो...', न्यूझीलंडने 3-0 ने व्हाईट वॉश दिल्यानंतर रोहितने मान्य केली चूक, म्हणाला, 'मनाला इतकं खुपतंय की...'

न्यूझीलंडने 3-0 ने कसोटी मालिका जिंकत व्हाईटवॉश दिल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पराभव स्विकारला असून, चुकाही मान्य केल्या आहेत.   

शिवराज यादव | Updated: Nov 3, 2024, 02:52 PM IST
'मी चुकलो...', न्यूझीलंडने 3-0 ने व्हाईट वॉश दिल्यानंतर रोहितने मान्य केली चूक, म्हणाला, 'मनाला इतकं खुपतंय की...'

न्यूझीलंडने 3-0 ने कसोटी मालिका जिंकत व्हाईटवॉश दिल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पराभव स्विकारला असून, चुकाही मान्य केल्या आहेत. रोहित शर्माने संघावर आणि स्वत:च्या कामगिरीवर खुलेपणाने टीका केली आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधील पराभवानंतर भारतीय संघाकडे कसोटी जिंकण्याची चांगली संधी होती. पण भारतीय फलंदाज ढेपाळले आणि सहज वाटणारं आव्हान कठीण झालं. ऋषभ पंत वगळता एकही फलंदाज न्यूझीलंडच्या फिरकीसमोर टिकला नाही. रोहित शर्मानेही पराभवानंतर हे मान्य केलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

“मालिका गमावणे, कसोटी गमावणे हे कधीच सोपं नसते, हे सहज पचण्याजोगे नसतं,” असं रोहितने सामन्यानंर सांगितलं. "आम्ही आमचे सर्वोत्तम क्रिकेट खेळलो नाही, आम्हाला हे माहित आहे आणि आम्हाला ते स्वीकारले पाहिजे. त्यांनी (न्यूझीलंड) आमच्यापेक्षा खूप चांगली कामगिरी केली. आम्ही खूप चुका केल्या आणि आम्हाला त्या स्वीकाराव्या लागतील. पहिल्या डावात (बंगळुरू आणि पुण्यात) आम्ही पुरेशा धावा केल्या नाहीत आणि आम्ही खेळात मागे होतो. येथे आम्हाला 30 धावांची आघाडी मिळाली, आम्हाला वाटले की आम्ही पुढे आहोत. हे लक्ष्य देखील साध्य करणं शक्य होतं. आम्ही अजून चांगली कामगिरी करावी लागेल," असं रोहित शर्माने सांगितलं. 

रोहित शर्माला त्याच्या कामगिरीबद्दल तसंच त्याच्या संपूर्ण मालिकेतील त्याच्या आक्रमक खेळीबद्दल विचारण्यात आलं असता, त्याने जेव्हा तुमचा पराभव होतो तेव्हा अशा गोष्टी चांगल्या वाटत नाहीत असं मान्य केलं. 

"तुम्हाला बोर्डावरही धावा हव्या असतात. माझ्या मनात (आज त्याच्या स्वत:च्या फलंदाजीवर) ही गोष्ट होती, ती आली नाही आणि जेव्हा ते घडते तेव्हा ते छान दिसत नाही. जेव्हा मी फलंदाजीला जातो तेव्हा माझ्या डोक्यात काही कल्पना असतात. परंतु या मालिकेत त्या कल्पना सत्यात उतरल्या नाहीत आणि हे माझ्यासाठी निराशाजनक आहे,” असंही तो म्हणाला.

तिसऱ्या कसोटीत काही धावा जमवणारे दोन फलंदाज शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांचे रोहितने कौतुक केलं. पण, अशा पराभवाची भावना दीर्घकाळ दुखावणारी आहे असंही त्याने कबुल केलं.

"त्या दोघांनी अशा खेळपट्टीवर (पंत, जैस्वाल आणि गिल) फलंदाजी कशी करायची हे दाखवून दिलं. तुम्हाला पुढे राहून सक्रिय व्हायला हवे. आम्ही गेल्या 3-4 वर्षांपासून अशा खेळपट्ट्यांवर खेळत आहोत, आम्हाला कसे खेळायचे हे माहित आहे. पण आम्ही यावेळी तशी खेळी करु शकलो नाही हे दुखावणारं आहे. तसंच मी फलंदाज आणि कर्णधार अशा दोन्ही नात्याने चांगली कामगिरी करु शकलो नाही आणि हे मला खुपत राहणारं आहे. पण आम्ही एकत्रितपणे चांगली कामगिरी करू शकलो नाही आणि हेच या पराभवाचे कारण आहे,” असा रोहितने निष्कर्ष काढला.

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More