शिखर धवन बळीचा बकरा, गावस्करांची जोरदार फटकेबाजी

 सध्या टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. टीम इंडिया कसोटी मालिका वाचविण्यासाठी धडपड करत आहे. मात्र, असे असताना फलंदाज शिखर धवनला वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनी धवनला वगळल्याने तीव्र शब्दात फटकारलेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 13, 2018, 08:28 PM IST
शिखर धवन बळीचा बकरा, गावस्करांची जोरदार फटकेबाजी title=

मुंबई : सध्या टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. टीम इंडिया कसोटी मालिका वाचविण्यासाठी धडपड करत आहे. मात्र, असे असताना फलंदाज शिखर धवनला वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनी धवनला वगळल्याने तीव्र शब्दात फटकारलेय.

दुसऱ्या सामन्यात सलामीवीर शिखर धवनला बाहेर बसवण्यात आले आहे. तसेच अजिंक्य रहाणे यालाही अंतिम अकरामध्ये स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे विराट कोहली नक्की काय साधतोय, असा सवाल उपस्थित करण्यात आलाय.

 धवनला संघाबाहेर बसवण्याचा निर्णय चुकीचा आहे, असे मत सुनील गावस्कर यांनी व्यक्त केलेय. धवनला आफ्रिकेमध्ये बळीचा बकरा बनवला गेल्याचे गावस्कर यांनी म्हटलेय.

धवन एका डावात खेळला नाही म्हणून त्याला संघाबाहेर बसविणे चुकीचे आहे, असा टोला गावस्कर यांनी लगावला. तसेच भुवनेश्वर कुमारच्या जागी इशांत शर्माची निवड करण्याच्या निर्णयावरही गावस्करांनी नाराजी व्यक्त केली आहे.

भुवनेश्वर कुमारच्या जागेवर इशांत शर्माची निवड का करण्यात आली हे मला समजले नाही. केपटाऊनमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भुवीने तीन बळी घेतले होते. इशांत शर्माला बुमराह किंवा शामीच्या जागी संघात स्थान देता आले असते. मात्र फॉर्मात असलेल्या भुवीला संघाबाहेर बसवणे योग्य वाटत नाही, असे  ते म्हणालेत.