वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर T20 World Cup साठी BCCIचा अ‍ॅक्शन प्लॅन

या सामन्यांना प्रेक्षकांना परवानगी असेल की प्रेक्षकांविनाच सामने होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. 

Updated: Apr 23, 2021, 04:25 PM IST
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर T20 World Cup साठी BCCIचा अ‍ॅक्शन प्लॅन title=

मुंबई: देशभरात कोरोनाचे रुग्ण वेगानं वाढत आहेत. त्याच दरम्यान कोरोनाचं महासंकट IPLवरही आहे. मात्र संपूर्ण काळजी घेऊन IPL सुरू आहे. IPL नंतर टीम इंडियाचा इंग्लंड दौरा आणि त्यानंतर भारतात टी 20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं आहे. यासंदर्भात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 

कोरोनाचा प्रादूर्भाव लक्षात घेऊन IPLसारखंच टी 20 वर्ल्ड कपचं नियोजन केलं जाणार आहे. एकावेळी दोन शहरांमध्ये सामने होणार आहेत. त्यानुसार बायो बबलचं नियोजन केलं जाईल. एकाचवेळी 9 किंवा 4 ठिकाणी सामने होणार नाही. तर IPLमध्ये एका दिवशी एक किंवा दोन सामने दोन शहरांमध्ये खेळवले जातात तसंच नियोजन वर्ल्ड कपसाठी करण्यात येईल असे संकेत देण्यात आले आहेत. 

भारतात एकूण 9 शहरांमध्ये सामने होणार आहे. तर महामुकाबला म्हणजेच अंतिम सामना अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. मुंबई, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, हैदराबाद, बंगळुरू, लखनऊ आणि धर्मशाला (हिमाचल) अशा नऊ ठिकाणी सामन्यांचं आयोजन करण्यात येईल.

दोन स्थळांवर सामने होतील आणि तशाच पद्धतीनं बायो बबलमध्ये खेळाडूंचं शिफ्टींग करण्यात येईल असं आतातरी नियोजन करण्यात आलं आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान याच्या तारखा असणार आहेत. 

कोरोनाचा धोका लक्षात घेऊन आणि त्यावेळची परिस्थिती पाहून अंतिम निर्णय घेण्यात येईल असंही यावेळी सांगण्यात आलं आहे. पाकिस्तानच्या क्रिकेट टीमला भारतात टी 20 वर्ल्डकपसाठी येण्याची परवानगी मिळाली आहे. तर या सामन्यांना प्रेक्षकांना परवानगी असेल की प्रेक्षकांविनाच सामने होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.