IND vs ENG : '...म्हणून आम्ही मॅच हारलो', कॅप्टन रोहितने 'या' खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर!

Rohit Sharma Statement : रोहित अँड कंपनीविरुद्ध इंग्लंडने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली (India vs England 1st Test) आहे. अशातच आता सामन्यात पराभव झाल्यानंतर कॅप्टन रोहित शर्माने नाराजी व्यक्त केली.

सौरभ तळेकर | Updated: Jan 28, 2024, 07:24 PM IST
IND vs ENG : '...म्हणून आम्ही मॅच हारलो', कॅप्टन रोहितने 'या' खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर! title=
Rohit Sharma Statement, India vs England 1st Test

India vs England 1st Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पाहुण्या संघाने यजमान संघाचा म्हणजेच टीम इंडियाचा 28 धावांनी पराभव केला आहे. टीम इंडियाला दुसऱ्या डावात विजयासाठी 231 धावा करण्याची गरज होती. मात्र, भारताची फलंदाजी 202 धावांवर ठेपाळली. त्यामुळे आता रोहित अँड कंपनीविरुद्ध इंग्लंडने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. अशातच आता सामन्यात पराभव झाल्यानंतर कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma Statement) नाराजी व्यक्त केली अन् नेमकी कोणती चूक झाली? यावर प्रकाश टाकला आहे.

काय म्हणाला रोहित शर्मा ?

सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा सामना चार दिवस खेळला गेलाय, त्यामुळे आमची चूक नक्की कुठं झाली, याचा खूप विचार करावा लागेल. आम्हाला 190 ची लीड मिळाल्यानंतर समाधान वाटलं होतं की आता सामन्यात आमचं पारडं जड असेल.. कारण मी भारतीय आणि विदेशी खेळपट्टीवर खेळलो आहे. मला वाटलं होतं की 230 धावा सामना जिंकण्यासाठी पुरेश्या ठरतील. मात्र, आमच्या खेळाडूंनी चांगली फलंदाजी केली नाही. ऑली पोपने उत्तम फलंदाजी केली अन् त्यांना आघाडी मिळवून दिली. सामना संपतो तेव्हा तुम्ही कुठं चुकला याचं विश्लेषण करण्याची गरज असते, असं रोहित म्हणतो.

आमच्या गोलंदाजांनी चुका केल्या नाहीत. ठरल्याप्रमाणे त्यांनी गोलंदाजी केली. मात्र, तुम्हाला पोपला मानावं लागेल. त्याने उत्तम खेळी केली. तुम्हाला काही गोष्टी मान्यच कराव्या लागतात. आम्ही टीम म्हणून फेल ठरलोय. धावा पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले नाहीत. मला वाटत होतं की बुमराह आणि सिराजने सामना 5 व्या दिवशी घेऊन जावा. कारण, पाचव्या दिवशी 20 ते 30 धावा करता आल्या असत्या. खालच्या बॅटिंग ऑर्डरने मॅचमध्ये खरोखरच चांगली झुंज दिली. त्यांनी दाखवून दिलंय की टॉप ऑर्डरने कुठं चूक केली, असं म्हणत रोहितने बॅटर्सवर टीका केलीये.

फलंदाजी करताना तुम्ही अधिक आक्रमकपणा दाखवायला पाहिजे होता. आम्ही संधीचं सोनं केलं नाही. अनेकदा तुम्हाला फलंदाजी करताना गोष्टी कळत नाही. आम्ही या सामन्यात अनेक चूका केल्या. त्यामुळे आता आगामी सामन्यात आमचे खेळाडू त्या गोष्टी सुधारतील, अशी आशा देखील रोहित शर्मा याने व्यक्त केली आहे.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन : बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फॉक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, मार्क वुड, टॉम हार्टले आणि जॅक लीच.