World Cup 2019 : वर्ल्ड कप जिंकून विजय जवानांना समर्पित करणार, विराटला विश्वास

३० मेपासून इंग्लंडमध्ये क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे.

Updated: May 22, 2019, 10:36 AM IST
World Cup 2019 : वर्ल्ड कप जिंकून विजय जवानांना समर्पित करणार, विराटला विश्वास title=

अंकुर त्यागी, झी मीडिया, मुंबई : ३० मेपासून इंग्लंडमध्ये क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. इंग्लंडला रवाना होण्याआधी भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत भारत वर्ल्ड कप जिंकेल, असा विश्वास विराट कोहलीने व्यक्त केला. तसंच वर्ल्ड कप जिंकून हा विजय जवानांना समर्पित करू, असं विराट म्हणाला.

इंग्लंडमधलं वातावरण आणि खेळपट्ट्यांपेक्षा तणाव कशापद्धतीने हाताळला जातो, हे महत्त्वाचं असल्याचं विराटला वाटतं. भारताचे सगळे बॉलर फ्रेश आहेत, कोणीच दमलेलं नाही, असं विराटने सांगितलं.

प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही भारत तिसऱ्यावेळी वर्ल्ड कप जिंकू शकतो, फक्त वर्ल्ड कपचा आनंद घेणं गरजेचं आहे, असा विश्वास वर्तवला. भारतीय टीम त्यांच्या क्षमतेनुसार खेळली तर वर्ल्ड कप जिंकू, असं शास्त्री म्हणाले. तसंच यंदाचा वर्ल्ड कप हा सगळ्यात कठीण आहे, कारण बांगलादेश आणि अफगाणिस्तानच्या टीम २०१५ वर्ल्ड कपपेक्षा जास्त मजबूत झाल्या आहेत, असं वक्तव्य शास्त्रींनी केलं.

या वर्ल्ड कपमध्ये एमएस धोनीची भूमिका महत्त्वाची असेल. खेळ पालटवण्याच्या त्या मोक्याच्या क्षणी धोनीपेक्षा चांगलं कोणीच नाही, अशी प्रतिक्रिया रवी शास्त्रींनी दिली.

वर्ल्ड कपमध्ये भारताच्या सुरुवातीच्या ४ मॅच कठीण असल्याची कबुली विराट कोहलीने दिली. या चारही मॅच कठीण असल्यामुळे कोणत्याही चुकांना जागा नाही. पण कठीण मॅच असल्यामुळेच हा वर्ल्ड कप आहे, असं वक्तव्य विराटने केलं.

वर्ल्ड कपमध्ये भारताच्या पहिल्या चार मॅच या दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि पाकिस्तान या टीमविरुद्ध आहेत.

फॉर्ममध्ये नसलेल्या केदार जाधव आणि कुलदीप यादव यांचीही विराटने पाठराखण केली आहे. एवढं क्रिकेट खेळल्यानंतर काही वेळा गोष्टी तुमच्या विरुद्ध जातात. कुलदीपसोबतही तसंच झालं आहे. आयपीएलमध्ये त्याचा फॉर्म ढासळल्यामुळे चांगलं झालं. या कालावधीमध्ये त्याला विचार करायला वेळ मिळाला. त्यामुळे तो वर्ल्ड कपमध्ये मजबूत मानसिकता घेऊन येईल. कुलदीप-चहल भारतीय बॉलिंगचे आधारस्तंभ आहेत, असं विराट म्हणाला.

केदार जाधवच्या आयपीएलमध्ये रन झाल्या नाहीत, पण तो चेन्नईच्या खेळपट्टीवर खेळत होता, हे विसरून चालणार नाही. केदार जाधव हा सध्या चांगल्या मानसिकतेमध्ये आहे, अशी प्रतिक्रिया विराटने दिली.

आमचे सगळे बॉलर फ्रेश आहेत. आयपीएलमध्येही खेळाडूंचं ध्येय आणि लक्ष वर्ल्ड कपवरच होतं. आयपीएलमध्येही ते ५० ओव्हर खेळण्याच्या मानसिकतेत होते, त्यामुळे ४ ओव्हर टाकल्यानंतरही बॉलर दमलेले दिसले नाहीत. आम्हाला कोणत्याच खेळाडूबद्दल चिंता नाही, कारण प्रत्येक खेळाडूमध्ये आत्मविश्वास आहे, असं विराटने सांगितलं.

इंग्लंडमधलं वातावरण आणि खेळपट्ट्यांमुळे मोठे स्कोअर होतील. वर्ल्ड कपसाठी प्रतिस्पर्धी टीमपेक्षा आपल्या टीमच्या क्षमतेनुसार खेळावं लागेल, असं मत विराटने व्यक्त केलं.