जहीर खानची टीम इंडियात निवड या माजी खेळाडूच्या एका फोनवर - सौरव गांगुली

टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खानचं सिलेक्शन कसं झालं? सौरव गांगुली यांनी सांगितला किस्सा

Updated: May 15, 2021, 12:44 PM IST
जहीर खानची टीम इंडियात निवड या माजी खेळाडूच्या एका फोनवर - सौरव गांगुली title=

मुंबई: भारताच्या इतिहासात सर्वात उत्तम वेगवान गोलंदाज म्हणून जहीर खानचं नाव घेतलं जातं. क्रिकेटच्या इतिहासात त्याने केलेली कामगिरी तर सर्वांच्या लक्षात राहण्यासारखी आहे. 92 कसोटी सामने खेळून त्याने 311 विकेट्स काढल्या तर 200 वन डे सामने खेळून त्याने 282 विकेट्स आपल्या नावावर केल्या होत्या. याच जहीर खानची टीम इंडियामध्ये निवड कशी झाली याबाबतचा एक खास किस्सा सौरव गांगुली यांनी सांगितला आहे. 

सौरव गांगुली यांनी बंगाली शो दादागिरीला दिलेल्या मुलाखतीमध्ये जहीर खानच्या निवडीदरम्यानचा किस्सा सांगितला आहे. जहीरचं सिलेक्शन एका फोनवरून झालं होतं. त्यावेळी वीरेंद्र सेहवाग, मोहम्मद कैफ, आर अश्विन, हरभजन सिंग, जहीर खान आणि व्ही व्ही एस लक्ष्मण उपस्थित होते. 

सौरव गांगुली म्हणाले की, 'मी जेव्हा कर्णधार होतो तेव्हा टीम निवडीची प्रक्रिया सुरू होती. त्यावेळी मला फोन आला. हा फोन जवागल श्रीनाथ यांचा होता. त्यांनी सांगितलं की एक डाव्या हाताने गोलंदाजी करणारा वेगवागन गोलंदाज आहे. त्याला संघात घ्यायचं आहे.' त्यांच्या एका फोनवर जहीरची संघात निवड झाली होती असंही गांगुली यांनी सांगितलं. 

जहीर खाननं यावेळी आपली भावना व्यक्त केली. 'इंडियन एअरलाइन्स आणि एमआरएफ पेस फाऊंडेशनचा सामना झाला होता. त्यावेळी जवागल श्रीनाथ यांनी देखील या सामन्यात सहभाग घेतला होता. या सामन्यात मी देखील खेळण्यासाठी होतो. त्या सामन्यात मी 8 विकेट्स घेतल्या होत्या. त्यावेळी श्रीनाथ यांनी मला म्हणाले की मी तुझं नाव खूप ऐकलं आहे. तू टीम इंडियासाठी खेळशील.'

जहीर खाननं ICC नॉकआऊट ट्रॉफीसाठी पहिल्यांदा केन्या विरुद्ध सामना टीम इंडियाकडून खेळला. जहीरनं पहिला कसोटी सामना 2000 रोजी बांग्लादेश विरुद्ध खेळला होता. शेवटचा कसोटी सामना न्यूझीलंड विरुद्ध 2014 रोजी खेळला होता. टी 20 मध्ये 2006 रोजी दक्षिण आफ्रिके विरुद्ध सामना खेळला आणि 2012 रोजी शेवटचा सामना पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेसोबतच खेळला होता.