कल्याणमध्ये महावितरण कार्यालयावर शिवसेनेची धडक

आमदारांची बिले कमी करता मग सर्वसामान्यांची का नाही? संतप्त शिवसैनिकांचा सवाल

Updated: Sep 11, 2020, 04:47 PM IST
कल्याणमध्ये महावितरण कार्यालयावर शिवसेनेची धडक title=
संग्रहित फोटो

कल्याण : लॉकडाऊन काळात नागरिक आर्थिक संकटात सापडले असताना महावितरणने भरमसाठ वीज बिले पाठवून नागरिकांना चांगलाच शॉक दिला. वीज बिल कमी करण्याची मागणी मनसे, विरोधी पक्षाकडून करण्यात येत असली, तरी अद्याप या मागणीबाबत निर्णय झालेला नाही. शुक्रवारी कल्याण शीळ रोड टाटा पावर येथील महावितरण कार्यालयावर शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी धडक देत महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी कल्याण पूर्व येथे तक्रार निवारण केंद्र उभारा, वीज मीटरची रिडींग 30 दिवसांच्या आत घ्या, वाढीव बिले कमी करुन घ्या, अशी मागणी केली. 

यावेळी, आमदारांचे बिल मोठ्या फरकाने कमी करु शकता आणि सर्वसामान्य जनतेला का वेठीस धरता, असा सवालही संतप्त शिवसैनिकांनी केला.

यापूर्वी कल्याण-डोंबिवलीत भाजपचे माजी राज्यमंत्री व आमदार रवींद्र चव्हाण आणि आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शेकडो भाजप कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत वीज बिल कमी करण्याची मागणी केली होती. लॉकडाऊन काळात महावितरणकडून नागरिकांना भरमसाठ विज बिलं देण्यात आली. ही विज बिलं कमी करण्यासाठी भाजपकडून राज्यभरात आंदोलनं सुरु आहेत. 

महावितरण कंपनीकडून भरमसाठ वीजबिले आकारण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. काही जणांना अंदाजे तर काही जणांना चुकीची बिलं पाठवल्याने मोठ्या प्रमाणात लोकांकडून असंतोष व्यक्त होत आहे. सुधारित बिलं पाठवण्याची मागणी होत असून महावितरण कार्यालयाच्या बाहेर मोठ्या रांगा लागल्याचं चित्र आहे.